मुंबई – रोहित शर्मा जर पूर्ण तंदुरुस्त ठरला तर त्याचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात समावेश असणे महत्त्वाचे आहे, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
रोहितच्या तंदुरुस्तीबाबत मला काहीही माहिती नाही. ते बीसीसीआय व रोहितच सांगू शकेल. ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. बीसीसीआय, फिजिओ व संघ व्यवस्थापनच यावर बोलू शकेल, पण जर पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेवर मायदेशी परतणार आहे तर मग त्यावेळी रोहित संघात असणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. जर रोहित पूर्ण तंदुरुस्त असेल तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलाच पाहिजे, असेही सचिन म्हणाला.
एकदिवसीय व टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर भारतासमोर कसोटी मालिकेचे आव्हान आहे. येत्या 17 डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. कर्णधार कोहली केवळ पहिल्या सामन्यासाठीच उपलब्ध असल्याने रोहितचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरेल, असेही सचिनने सांगितले.
पहिल्या सामन्यानंतर कोहली मायदेशी परतणे, अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा संघात नसणे अशा परिस्थितीत नवोदित टी. नटराजनला कसोटी संघातही संधी देणे आवश्यक आहे, असेही त्याने म्हटले आहे.