नगर – प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या संचालक मंडळाने अलिकडेच सभासदांना भींतीवरची घड्याळे भेट दिली. तथापि, त्यात मोठाच गैरकारभार झाल्याचा संशय गुरुकुल मंडळाने व्यक्त करत चौकशीची मागणी केली.
ती मान्य करुन चौकशी देखील सुरु झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या चौकशीचा स्पष्ट अहवाल समोर येत नसल्याने या चौकशीकडे संशयास्पद दूर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप गुरुकुल मंडळातर्फे करण्यात आला आहे.
सभासदांना वाटण्यात आलेल्या घडळ्यांची बाजारतील किंमत अगदीच कमी आहे. त्या मानाने खरेदीसाठी लागलेली रक्कम अवाजवी असल्याचा दावा गुरुकुलु मंडळाने केला होता. या कथित गैरकारभाराची तक्रार गुरुकुल मंडळातर्फे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावरुन उपनिबंधकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक केली.
परंतु महिना उलटला तरी चौकशी अधिकाऱ्यांनी अजून चौकशी पूर्ण केलेली नाही, असा दावा गुरुकुल मंडळातर्फे करण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते रावसाहेब रोहकले अध्यक्ष असताना त्यांनी बॅंकेच्या शताब्दि वर्षानिमित्त आनंद साजरा करण्यासाठी एक कोटी रुपयांची अर्थिक तरतूद केली. विकास मंडळाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी नियम धाब्यावर बसवून त्याच निधीतून खर्च केला. रोहकले सेवानिवृत्त झाल्यानंतर इतर संचालकांनीही सभासदांच्या भावनेचा विचार न करता त्या रकमेचा अवाजवी खर्च चालूच ठेवला.
संचालकांमध्ये कल्पकतेची दिवाळखोरी असल्याने काय वस्तु सभासदांना भेट द्यावी? याचेही भान त्यांना राहिले नाही, अशी टीका गुरुकुल मंडळातर्फे करण्यात आली आहे. गुरुकुलने यापूर्वीच या कथित भ्रष्ट भेटवस्तुंवर बहिष्कार घातला आहे. बॅंकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणामध्येही या अपारदर्शक व्यवहारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
त्यामुळे या गैरव्यवहाराची त्वरित चौकशी व्हावी, त्यात विरोधकांची मते नोंदवावीत अशी मागणी शिक्षक नेते डॉ.संजय कळमकर, रा. या. औटी, संजय धामणे, नितिन काकडे, सुदर्शन शिंदे, वृषाली कडलग, राजेंद्र ठाणगे, बापू लहामटे, दशरथ देशमुख, इमाम सय्यद, राजेंद्र पट्टेकर, सीताराम सावंत, विजय काकडे, भास्कर नरसाळे, संजय नळे, सुखदेव मोहिते, मिलिंद पोटे, रघुनाथ लबडे, संभाजी औटी, संतोष डमाळे यांनी केली आहे.
कर्जावरील व्याजदर कमी करण्याबाबत गुरुकुलच्या भावना तीव्र आहेत. कायम ठेवीवर दरवर्षी देण्यात येणारा आकडा निश्चित करून बॅंकेने चूक केली. ठेवीवर वर्षातून एकदाच व्याज मिळते. कर्जदाराला मात्र महिन्याला व्याज भरावे लागते. ठेवीदार बॅंकेकडून पैसे घेतो. कर्जदार बॅंकेला नफा देतो. शिवाय तो गरजवंत असतो. त्यामुळे संचालकांनी तातडीने कर्जावरील व्याजदर कमी करावेत.
डॉ. संजय कळमकर , शिक्षक नेते, गुरुकुल मंडळ.