पुणे – अनलॉकमुळे राज्य आणि परराज्यातून विविध प्रकारच्या मासळीची आवक बाजारात वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक अधिक होत असल्याने सुरमई, पापलेट, कोळंबी, हलवा आदी मासे स्वस्त झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
परदेशी म्हणाले, लॉकडाऊन काळात वाहतुकीला मर्यादा येत होत्या. वाहतूक बंद असल्याने मासेमारी थांबली होती. त्यामुळे शहरात मासळीचा तुटवडा जाणवत होता. त्याचाच परिणाम म्हणून बहुतांश प्रकारच्या मासळीचे भाव वाढले होते.
मात्र, आता अनलॉकमुळे राज्यात तसेच परराज्यात मासेमारी जोरात सुरू आहे. त्यामुळेच मागील 15 ते 20 दिवसांपासून मागणीपेक्षा आवक अधिक होत आहे. म्हणूनच मासळीचे वाढलेले भाव कमी झाले आहेत. आवक अशीच कायम राहिल्यास आणखी काहीकाळ भाव स्थिर राहतील, असा अंदाजही परदेशी यांनी व्यक्त केला.
मासळीचे किरकोळ बाजारातील भाव
सध्याचे भाव आणि आठवडापूर्वीचा भाव (भाव किलोमध्ये)
सुरमई 360 रुपये -480 रुपये
पापलेट 440- 480 रुपये -500-550 रुपये
कोळंबी 320 रुपये -360-400 रुपये
हलवा 400 रुपये -480 रुपये.