पुणे -“शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांना “प्रमोशन’ करण्यासाठी आहे. जनतेच्या पैसे या कार्यक्रमावर खर्च केले जातात. सरकारी यंत्रणे वापर करून करोडो रुपये खर्च करण्यात आले आहे. शासन आपल्या दारी हा एक नवीन जुमला सरकारने केला असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच, सत्ताधाऱ्यांचे प्रमोशन करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले.
खासदार सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जेजुरी येथे झालेल्या “शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी एसटी भरून नागरिक आणण्यात आले होते. तसेच, चार वेळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला, त्यामुळे लाभार्थ्यांना दाखले व लाभ मिळण्यास उशीर झाला, याबाबत विचारले असता खासदार सुळे म्हणाल्या की, शासन आपल्या दारी कार्यक्रम म्हणजे सत्तांधाऱ्यांचे प्रमोशन आहे.
खर्चाची माहिती मागविणार…
जेजुरी येथे झालेल्या “शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा खर्च मागविणार का, असे विचारले असता खासदार सुळे यांनी सांगितले की, याबाबतची माहिती मागविणार आहे. केंद्र सरकारला काहीतरी लपवायचे आहे. त्यामुळे माहिती अधिकारातूनसुद्धा पूर्ण माहिती मिळत नाही.