सांगली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. यादरम्यान त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. हे सरकार ओरबाडून सत्तेवर आलेले आहे. टीका झाल्यानंतर मंत्री नेमले, मात्र अजूनही कित्येक मंत्री आपल्या विभागात गेलेले नाहीत. त्यामुळे नेमकं सरकार कोण चालवतय ते देवालाच माहित. अशी टीका सांगली येथील एका कर्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) सांगली येथे क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. याठिकाणी आशा सेविकांना सायकल वाटप आणि निराधार कुटुंबांना मदत त्याचबरोबर नाना-नानी पार्कचे उद्घाटन अशा कार्यक्रमांचे सुळे यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपसहीत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवरही टीका केली. सुळे म्हणाल्या, “सध्याच्या सरकारमधील नेत्यांकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी वक्तव्य केली जात आहेत.”
“टीका झाल्यानंतर यांनी मंत्री नेमले, मात्र हे मंत्री अद्यापही आपल्या विभागात गेलेले नाहीत. त्यामुळे सध्याच्या सरकारमध्ये सामान्य माणूस हा सर्वात जास्त भरडला जात आहे. हे सरकार ओरबाडून सत्तेवर आलेले आहे. मंत्रालयात गेले तर त्या खात्याचे मंत्रीच भेटत नाहीत”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी केंद्रातील राजकारणावरही भाष्य केले.