नेवासा – शनिशिंगणापूर (ता.नेवासा) येथील गणेश भूतकर खून प्रकरणातील संशयित आरोपी अविनाश बानकर याला तब्बल पाच वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून जामिन मंजूर झाला आहे. याप्रकरणात इतर सहा संशयित आरोपी या अगोदर पासूनच जामिनावर आहेत.
शनिशिंगणापूर येथील गणेश भूतकर याची २०१७ मध्ये जुन्या भांडणातून हत्या झालेली होती. याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी म्हणून अविनाश बानकरसह इतरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे अविनाश बानकर याच्यासह इतर आरोपींवर खुनासह विविध कलमन्वे न्यायालयात खटला चालवला जात आहे.
सदर खटल्यामधे नियमित जामिन मिळावा यासाठी मुख्य संशयित आरोपी अविनाश बानकर याने औरंगाबाद खंडपीठात ऑक्टोबर 2023 रोजी जामीन अर्ज दाखल केला होता,परंतु सदरचा जामिन अर्ज फेटाळण्यात आल्याने सदर आदेशा विरोधात बानकर याने सर्वोच्चा न्यायलय (नवी दिल्ली ) येथे विशेष याचिका दाखल करुन आव्हान दिलेले होते.
सदर याचिकेवर आरोपीला जामीन मिळण्यासाठी योग्य पद्धतीने युक्तीवाद करुन अपीलकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयात मुद्देसुद बाजू मांडत अपीलकर्ता पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. 2019 मध्ये आरोप निश्चित करण्यात आले होते आणि फिर्यादीच्या ३५ साक्षीदारांपैकी आजपर्यंत फक्त दोन साक्षीदार तपासले गेले आहेत.
केवळ याच आधारावर सर्वोच्च न्यायालयाने सहआरोपी भाऊराव आणि लखन उर्फ लक्ष्मण यांना 2023 मध्ये जामीन मंजूर केलेला आहे. तसेच या गुन्ह्यातील सहआरोपीही जामिनावर असल्याचे म्हणने त्यांनी न्यायालयात सादर केले आणि या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने मुख्य संशयीत आरोपी अविनाश चांगदेव बानकर यास अखेर जामीन मंजूर केला. आपिलार्थी बानकर यांच्यावतीने जेष्ठ विधिज्ञ सुदांशू चौधरी,विधिज्ञ ऋचा पांडे तसेच नेवासा येथील प्रसिद्ध विधिज्ञ अॅड.रोहित रविंद्र जोशी यांनी काम पाहिले.