एकविसाव्या शतकात नारी शक्ती कोठेही कमी नाही. संवेदनशीलता… सहनशीलता… प्रभावी निर्णयक्षमता… महत्त्वाकांक्षा, असे एक ना अनेक गुण स्त्रीमध्ये आहेत. त्यामुळे राजकारण असो वा समाजकारण. स्त्रियांना समानतेचे स्थान मिळालेच पाहिजे, अशी कणखर भूमिका घेऊन स्वभावाने शांत पण तितक्याच परखडपणे चुकीच्या गोष्टींचा विरोध करत आपले विचार स्पष्टपणे मांडणारे नाव म्हणजे नगरसेविका राणीताई रायबा भोसले.
नगरसेविका म्हणून अवघ्या तीन वर्षांत राणीताईंनी आपल्या कामाचा विशेष ठसा माध्यमातून उमटवला आहे. राजकारण, समाजकारण, महिलांचे प्रश्न, नागरिकांच्या नेमक्या समस्या अशा वेगवेगळ्या पैलूंची उत्तम जाण असलेल्या राणीताई तितक्याच कुटुंबवत्सलही आहेत. घर आणि राजकारण अशा दुहेरी जबाबदारीची यशस्वी सांगड घालत राणीताईंचा सुरू असलेला हा प्रवास राजकारणात येऊ घातलेल्या अनेक युवतींसाठी आदर्शवत असाच आहे.
उच्च शिक्षित असलेल्या राणीताई भोसले यांनी वकिलीची बी.एस.एल. ही पदवी घेतली आहे. राणीताईंचे चुलते रमेश कोंडे हे शिवसेनेचे मोठे नेते असल्याने त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. राणीताईंना लग्नानंतर पती रायबा भोसले यांच्यामुळे समाजकारण जवळून पाहता आले. रायबा भोसले हे गेली 20 वर्षे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांची धनकवडी, बालाजीनगर परिसरात विशेष ओळख आहे.
महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राणीताईंनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला पहिल्यांदाच सामोरे गेलेल्या उच्चशिक्षित, सामाजिक, आर्थिक, राजकीय तसेच महिलांच्या प्रश्नांविषयी उत्तम जाण असलेल्या राणीताईंना मतदारांनी साथ देत प्रभाग क्रमांक 38 मधून महापालिकेच्या सभागृहात आपले प्रतिनिधी म्हणून पाठविले.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या भागातून भाजपचे कमळ फुलवणाऱ्या त्या पहिल्या नगरसेविका ठरल्या, हे विशेष. त्यांच्या या प्रतिभेची दखल घेत त्यांची राजकारणातील चुणूक, राजकरणात नसताना महिलांच्या उन्नतीसाठी, त्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी राजगड महिला सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून केलेल्या अविरत कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. महापालिकेत भाजपच्या इतिहासातील या समितीच्या राणीताई पहिल्या अध्यक्षा ठरल्या. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत त्यांच्या या कामाचा आलेख सातत्याने उंचावत असून त्यांनी महिला आणि बालकल्याण समितीसह, शहर सुधारणा समिती आणि नाव समितीच्या सदस्य म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा असताना महिलांच्या आरोग्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनविषयक जनजागृती तसेच शहराच्या कचऱ्यात थेट येणाऱ्या या वैद्यकीय कचऱ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन महापालिका शाळांमधील मुलींसाठी मोफत नॅपकिन देण्यासह प्रत्येक प्रभागात या नॅपकिन डिस्पोजल मशीन करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा ठराव मंजूर केला. याशिवाय शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन तसेच समाज विकास विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले.
गेल्या तीन वर्षांपासून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेविका म्हणून राणीताईंचे कार्य उल्लेखनीय आहे. प्रभागाची माहिती, नेमक्या समस्या तसेच मतदारांशी संवाद साधत राणीताईंसोबतच भाजपचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून नागरिकांशी उत्तम संवाद असलेले रायबा भोसले यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यातून या प्रभागातील वर्षानुवर्षे असलेल्या समस्या सोडवणे सहज शक्य झाले आहे. त्यात प्रभागातील युवक व युवतींसह महिलांसाठी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणारा लाइट हाऊस प्रकल्प, राजस सोसायटीमधील ओटा मार्केट, गुजरवाडी येथे महापालिकेच्या माध्यमातून दवाखाना सुरू करण्यात आला असून, येथे महिलांसाठी कॅन्सर तपासणी सुविधाही लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय प्रभागात उद्याने, पाण्याची टाकी, तसेच आवश्यक ठिकाणी महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तर, प्रभागातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावर राणीताईंनी नुकतीच पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून बालाजीनगर येथील पोलीस मदत केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणीही पत्रादारे केली आहे.
महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न
महिलांच्या आर्थिक समक्षीकरणासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी गेल्या आठ वर्षांपासून राजगड महिला सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून राणीताई आणि रायबा भोसले अवितरतपणे कार्यरत आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील महिलांसह सर्व महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासालाही चालना द्यावी, या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे. यातून आतापर्यंत महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम संस्थेने राबवले आहेत. त्यात महिलांच्या आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक व्याख्याने, पारंपरिक सण साजरे करणे, सांस्कृतिक कार्यक्रम, रोजगारविषयक व्याख्याने तसेच प्रशिक्षण, रोजगार मेळावे असे उपक्रम पूर्ण वर्षभर राबवले जातात आर्थिक दुर्बल महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य तसेच इतर प्रकारची मदत राणीताई करतात.
पंतप्रधानांशी साधला संवाद
लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरातील नगरसेवक तसेच भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यासाठी महाराष्ट्रातून पुण्याची निवड झाली होती. तर, पुण्यातूनही पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी शहर भाजपकडून 15 नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली. यामध्ये राणीताईंची निवड झाली होती. हा क्षण त्यांच्या कारकिर्दीत आणखी एक पैलू जोडणारा ठरला. यावेळी राणीताईंच्या या निवडीचे विशेष कौतुकही झाले होते. हा क्षण आपल्यासाठी शब्दांपलीकडे असल्याचे राणीताई सांगतात.
कुटुंबवत्सल राणीताई
राणीताई केवळ राजकरण आणि सामाजिक जबाबदारीच पार पाडतात, असे नाही. तर, त्या तितक्याच कुटुंबवत्सलही आहेत. सामाजिक आणि राजकीय जबाबदारी सक्षमपणे सांभाळताच संयुक्त कुटुंबात असलेल्या राणीताई सर्वांच्या लाडक्या आहेत. त्यांचा मोठा मुलगा अथर्व हा इयत्ता दहावीला असून, लहान मुलगा अर्जुन हा इयत्ता पाचवीला आहे. या दोन्ही मुलांच्या शैक्षणिक जबाबदाऱ्यांसह कुटुंबाच्या नियमित कामाचीही जबाबदारी त्या तितक्याच सक्षमपणे पेलतात. राणीताईंचे सासू-सासरे दौंड येथे शेती करतात.
त्यांच्यासाठीच्या आवश्यक कामांची जबाबदारी सांभाळत मुलांचा अभ्यास, पालक सभांना उपस्थिती, सामाजिक आणि राजकीय कामातून वेळ काढत मुले आणि कुटुंबासाठी त्या वेळ राखून ठेवत, ही जबाबदारीही खंबीरपणे पार पाडतात. या सर्वांत पती रायबा भोसले यांचा आपल्या पाठीशी भक्कम आधार असून त्यांची प्रेरणा आणि सातत्याने प्रत्येक कामात असलेली बहुमोलाची साथ यामुळेच आपण या जबाबदाऱ्या अधिक सक्षमपणे पार पाडू शकत असल्याचे त्या राणीताई नम्रपणे सांगतात.
संकलन : सुनील राऊत (प्रतिनिधी)