केशरताई सदाशिव पवार यांचे उल्लेखनीय कार्य आणि प्रेरणादायी प्रवास
आज प्रत्येक क्षेत्रांत महिलांनी आपले नावे कोरले आहे. प्रामुख्याने इंजिनियरिंग, मेडिकल, शिक्षक-प्राध्यापक या क्षेत्रांत तर महिला पूर्वीपासूनच आहेत. आता तर महिला या समाजकारण आणि राजकारणात सुद्धा अग्रभागी आहेत. या क्षेत्रातही महिलांनी असाच वेगळा ठसा उमटवला आहे. अशा काही निवडक महिलांमध्ये केशरताई सदाशिव पवार यांचा समावेश करता येईल.
केशरताई पवार यांच्या कार्याची सुरुवात पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रजच्या संचालक म्हणून झाली. गेली 15 वर्षे त्या हे पद संभाळत आहेत. या काळात त्यांनी उपाध्यक्ष पददेखील भूषविले आहे. त्यांना प्रत्येक कार्यात मोलाची साथ असते ती पती सदाशिव पवार यांची. सदाशिव पवार यांची शिरूर येथे बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाची भव्य संस्था आहे. या शिक्षण मंडळाअंतर्गत एकूण पाच शाळा आहे. त्यामध्ये सुमारे 2 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण मंडळाच्या केशरताई या संस्थापिका आहेत. सदाशिव पवार आणि केशरताई पवार यांनी मिळून ही संस्था उभी केली आहे. या संस्थेचा वटवृक्ष आज बहरला आहे.
केशरताई यांनी कात्रज दूध संघाच्या माध्यमातून शिरूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण केंद्र राबवले आहेत.अधिक दुधाचे उत्पादन शेतकऱ्यांनी कशाप्रकारे केले पाहिजे, याची शासकीय माहिती या प्रशिक्षणातून देण्यात येते. गावोगावी महिलांसाठी प्रशिक्षण आणि मागर्दशन मेळावेदेखील राबवण्यात येतात. महिलांचे आत्मबल वाढवून त्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत, हाच मुख्य उद्देश असल्याने त्यामुळेच विविध ठिकाणी स्नेहमेळावेदेखील घेण्यात आले आहेत. त्याचा फायदा आतापर्यंत शेकडो जणांनी घेतला आहे.
सदाशिव पवार आणि केशरताई यांना सामाजिक कार्याची विशेष आवड आहे. आपल्या मुलीच्या लग्नासाठी शेतकरी कर्ज काढतो आणि अखेर कर्जाच्या चक्रव्यूहात अडकतो. त्यामुळे पवार दाम्पत्याने सामुदायिक विवाह सोहळा कार्यक्रम राबवण्याचे ठरवले. शिरूर तालुक्यातील जातेगाव येथे सर्वधर्मियांसाठी हा विवाह सोहळा आयोजित केला जातो. बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येतो. आतापर्यंत 104 जोडप्यांचा विवाह करण्यात आला असून, या सोहळ्यात वधू-वरास संपूर्ण पोषाख आणि संसारोपयोगी साहित्य दिले जाते.
दिवसेंदिवस या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिरूर परिसरात बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ नावाने संस्था स्थापन करून परिसरातील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य केशरताई पवार आणि सदाशिव पवार करत आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानसुद्धा मिळाले पाहिजे, त्यासाठी पवार दाम्पत्याने विविध उपक्रम सुरू केले आहेत. यात मातापूजन, कविता-गाणी सादर करणे, बॅंकेची माहिती देणे,भाजी खरेदी-विक्रीची माहिती देणे अशा उपक्रमांचा समावेश होतो.
केशरताई सध्या शाळेच्या संस्थापिका आणि खजिनदार आहेत. शाळेच्या माध्यामातून विविध क्रीडा स्पर्धा आणि रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या क्रीडापटूंना देशी गाईचे दूध देण्याचा अनोखा उपक्रमदेखील शाळेच्या माध्यमातून राबवला जातो. प्रत्येकाचे स्वप्न असते, की स्वत:चे घर व्हावे. गरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे हक्काचे घर होणे हे अत्यंत कठीण असते. अशा गोरगरिबांना पुण्यात आणि पुण्याबाहेर योग्य किंमतीत किंवा हफ्त्याने जागा देण्याची योजना केशरताई आणि सदाशिव पवार यांनी राबवली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. आज शेकडो गरिबांना हक्काचे घर मिळाले आहे. केशरताई या रोटरी क्लब ऑफ पुणे नगर रोडच्या सदस्या असून महिला सबलीकरणासाठी त्यांनी या विशेष काम केले आहे.
आजचे प्रत्येक क्षेत्र हे महिलांच्या प्रभुत्वाने व पावित्र्याने प्रभावित झाले आहे. त्यामुळेच केशरताईसुद्धा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. शैक्षणिक, सामाजिक किंवा राजकीय क्षेत्र असो प्रत्येक ठिकाणी केशरताईंच्या कामाचा दबदबा आहेच, विशेष म्हणजे त्याला साथ लाभली आहे ती सदाशिव पवार यांची. त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच आज केशरताई प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या या कार्याचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवरही झाला आहे. इंडो ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
चांगले विद्यार्थी घडवणे हाच उद्देश
आम्हा दोघांचे शिक्षण हे ग्रामीण भागात झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी आल्यावर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो. तो आमच्यातही होता. आपल्या पुढच्या पिढीला हा वारसा द्यायचा नाही, असे आम्ही ठरविले होते. त्यामुळे आम्ही शहरातील शाळांप्रमाणेच ग्रामीण भागातही सीबीएससी पॅटर्न आणि राज्य बोर्डाच्या अशा एकूण पाच शाळा आम्ही सुरू केल्या आहेत. चांगले विद्यार्थी घडवणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे, असे सदाशिव पवार सांगतात.
– सदाशिव पवार
श्री गणेश मंदिराची उभारणी
केशरताई आणि सदाशिवअण्णा यांना धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्राची विशेष आवड आहे. या आवडीतून त्यांनी जातेगाव येथे स्वखर्चातून श्री गणेशमंदिराची उभारणी केली आहे. या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. ग्रामीण भागातील मंदिरांच्या उभारणीसाठीसुद्धा केशरताई मदत करत असतात.
संकलन
चंद्रकांत जगधने
प्रतिनिधी