आनंदी गोपाळ चित्रपटातील हे गाणं ऐकलं की असं वाटतं की खरंच स्त्री जन्म हा पावलोपावली नवीन काहीतरी शिकण्यात जातो, एकच जन्म घेऊन नव्याने पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचं भाग्य हे केवळ स्त्रीलाच मिळालंय असं म्हणता म्हणता क्षणात वाटत की एकाच जन्मात तिला पुन्हा पुन्हा मरावे ही लागते, मग काय फायदा त्या मार्गांचा जिथे तिला भित भित जगावं लागेल, आणि जगता नाहीच आलं तर जिवंतपणी मरावे लागेल.
हे सर्व प्रश्न प्रत्येक स्त्रीला रोज पडतात, पण स्त्रीचं आयुष्य दुखण्यानी च भरलेलं असतं, म्हणून हे काय नवीन असं बोलून त्याकडे कानाडोळा केला जातो.
सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिक्षणाची ज्योत दिली पण आज २१ व्या शतकातही उच्च शिक्षित अशी प्रत्येक स्त्रीसुद्धा तीच भीती मनात घेऊन वावरते जी २०० वर्षा पूर्वीची स्त्री घेऊन वावरयची. मग स्त्री जन्म हा स्वतंत्र आहे, सुरक्षित आहे हे आपण कसे बोलू शकतो.
महिला दिनाचं औचित्य साधून आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो त्यामध्ये स्त्रियांना बोलकं करतो आणि काही ठिकाणी नाईट रॅली काढली जाते, की त्यांना रात्रीही सुरक्षित वाटावे, पण इथे ही स्त्री दिवसा सुरक्षित नाही ती रात्री काय असणार हा प्रश्न उद्भवतो आणि हा सारा कार्यक्रम आणि ट्रेकिंग चा फाफटपसारा केवळ त्याच दिवसासाठी देखावा.
मुळात मला हा महिला दिन पटतच नाही, कारण आज देश जरी स्वतंत्र झाला असला तरी स्त्री अजुनही परतंत्रमध्ये आहे, या समाजाची बनविलेल्या रुढींमध्ये ती स्वतः ला सिद्ध करते आहे. तिला हक्क आहे आपले मत मांडण्याचा अधिकार आहे पण ती मनातून सुरक्षित नाही. आणि जो पर्यंत ती भीती प्रत्येक स्त्रीच्या मनातून जात नाही तोपर्यंत मन मारून स्वातंत्र्य उपभोगण्या ला काहीच अर्थ नाही.
स्त्री जन्मावर बोलावे तेवढे कमीच आहे कारण आज स्त्री अत्याचाराची मर्यादा एवढी वाढली आहे की प्रत्येक पालक आपल्या मुलीला मोजकेच शिक्षण देऊन घरी बसवण्याचा विचार करत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या अत्याचाराच्या भीतीने स्त्रियांचं शिक्षण पुन्हा खालवणार आहे, आणि यात पर्याय शोधणे आवश्यक आहे.
मला फक्त एवढच वाटतं स्त्रियांनी काही नवीन वेगळे करण्यासाठी केवळ महिला दिनाचे निमित्त न साधता रोज आपल्या साठी काही तरी करत राहावे. जे वर्षानुवर्षे चालत आले आहे, तो लोकांचा समज, चालीरीती तोडणे आवश्यक आहे, पण त्याहीपेक्षा प्रत्येक स्त्रीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. ज्या घटना घडून गेल्या आहेत त्यातून धडा घ्यावा आणि पुढे प्रवास करत रहावा, वाट चुकली म्हणून पुढे जाणं सोडायचे नाही तर दुसरी वाट आपण स्वतःहून शोधून काढावी.
सरकारने काही नवीन तरतुदी करणे आवश्यक आहे, स्त्री अत्याचार रोखण्यासाठी स्त्रियांना जेवढे सुदृढ बनवायची गरज आहे, तेवढी समाज वृत्ती, पुरुषी विचारसरणी बदलणे आवश्यक!
ज्या दिवशी स्त्री पुरुष समान असेल, प्रत्येक स्त्री ही रात्री अपरात्री एकटीने प्रवास करू शकेल, तेव्हा खरा महिला दिनाला अर्थ येईल, आणि ते घडेल की नाही हा मात्र एक प्रश्नच!
– भारती उबाळे,
कॉलेज रिपोर्टर,
गरवारे महाविद्यालय