15 जानेवारी म्हणजे मकरसंक्रांत, हा दिवस उत्तरायनाचा आरंभदिन म्हणूनही संक्रांतीला अयनसंक्रांत असेही नाव आहे.
दरवर्षी नित्यानं येणारा सण म्हणजे मकर संक्रांत! कॅलेंडरीय नववर्षाचा पहिला सण मकरसंक्रांत. म्हणजे सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारित सण. सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तसा तो जानेवारीत म्हणजेच पौष महिन्यात देखील करतो. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्या संक्रमणाला मकरसंक्रांत असे म्हणतात. या दिवसाला विशेष महत्त्व असे की, या दिवसापासून सूर्याच्या उत्तरायनाला प्रारंभ होतो. उत्तरायनालाच उद्गयन, ग्रीष्मायन किंवा देवयान असेही म्हणतात. पौष ते आषाढ म्हणजे जानेवारी ते जुलै असा हा काळ असतो. कोणतेही शुभ कार्य उत्तरायनात करावे असा एक संकेत आहे. एक सण आणि एक पुण्यपर्व म्हणून मकरसंक्रांतीला फार महत्त्व आहे.
मकरसंक्रांतीला संक्रांतदेवीची पूजा केली जाते. हे देवीचे रौद्ररूप आहे. दरवर्षी ही देवी एखाद्या वाहनावर बसून येते. दरवर्षी देवीचे वाहन बदलते असते. देवीचे वाहन आणि सोबतच्या वस्तू काही घटनांच्या सूचक मानल्या जातात. देवी ज्या दिशेकडून येते तिथे समृद्धी असते. ती ज्या दिशेकडे पाहते, जाते त्याठिकाणी संकट येतात. म्हणूनच एखाद्यावर संक्रांत आली असे म्हटले जात असावे. वास्तविक देव किंवा देवी आपल्या भक्तांवर संकट आणत नाही. ती नेहमीच कृपा करणारी असतात.
कोणत्याही संक्रमणाचा काळ हा बदलाचा असतो. संक्रमण म्हणजेच बदल होय. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यातला हा पहिला सण. नव्या विचारांच्या स्वागताचा काळ. नव्या ऋतूच्या आगमनाचा काळ. अशा वेळी हा काळ संकटाचा कसा असू शकतो? पौषाचे सुंदर नाचरे वारे माणसाच्या मनात एक नवा हुरूप आणतात. या वाऱ्यांची खरी सुरुवात डिसेंबरच्या मध्यावर सुरू होते. वर्ष संपायला अवघे काही दिवस असताना पौषाचे वारे एखाद्या दुपारी अचानक सुरू होतात. तेव्हा मनाला खरंच जाणीव होते ती नव्या वर्षागमनाची.
निळ्याभोर आकाशात विहरणारे रंगीत पतंग, मुलांचा जल्लोष आणि काळ्या रंगाच्या विविध छटा असलेल्या सुंदर साड्या परिधान केलेल्या महिला, संक्रांतीचा माहोलच असा असतो की विचारू नका. कुठेतरी आंब्यांच्या मोहोराचा सुंदर गंध, क्वचित कुठे मोगरा एकटाच बहरलेला, रात्रीच्या वेळी उमलणारी रातराणी, चमेलीचा निरोप घेत एखादी कळी फुलं झालेली…काय नसतं हो आसमंतात? “घेता किती घेशील दो करांनी’ अशी अवस्था असते. फार सुंदर दिवस. खरं तर सुरुवातीचा काळ आणि निरोपाचा काळ हा फार आवडीचा. डिसेंबर जणू म्हणतो, सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे, सप्रेम द्या निरोप. वर्षभराच्या सुख-दु:खाची वजाबाकी करतो आणि आपल्या खांद्यावरील काळाची पालखी मार्गशीर्ष पौषाला सोपवतो. हाच तो खांदेपालटाचा काळ, संक्रमणाचा काळ. तो नक्कीच सुखद असतो. अशा वेळी येणारी ही संक्रांत निश्चितच शुभ आहे.
भारतात हा सण सर्वदूर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पद्धती, रितीभाती जरी वेगळ्या असल्या तरी आनंद, उत्साह हा एकच असतो. उत्तर भारतात या दिवशी डाळ-भात याची खिचडी बनवली जाते. तिचे दानही केले जाते. याला संक्रांत खिचडी असे नाव आहे. बंगालमध्ये काकवीत तीळ घालून तिळुआ नावाचा पदार्थ बनवतात. काकवी म्हणजे गुळाचा पाक. महाराष्ट्रात तिळगुळाची पोळी, मुगाची खिचडी असा प्रसाद बनवला जातो. तीळगुळ देऊन आपले स्नेहसंबंध दृढ केले जातात. कदाचित थंड वातावरणामुळे तीळगुळाचा वापर जास्त केला जात असावा. कारण आपल्याकडे येणाऱ्या सणांना ऋतुमानासुसार गोड पदार्थ करण्याची प्रथा आहे. शादी किसकी भी हो दिल तो अपना गाता है! याप्रमाणे सण कोणताही असो गोड पदार्थ बनविणे आणि खाणे गरजेचे आहे. तीळगुळाचेसुद्धा अनेक प्रकार बनतात. इंदौरकडे गजक हा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळात महिलांना आपली कलाकुसर दाखविण्याची एक उत्तम संधी संक्रांतीच्या निमित्ताने मिळत असे. संक्रांतीचे दागिने हा आणखी एक कलाविष्कार आहे.
लग्नानंतर येणारी पहिली संक्रांत उत्साहाने साजरी केली जाते. नववधूला काळी साडी, हलव्याचे दागिने दिले जातात. हळदीकुंकवाचा मोठा थाट असतो. तसेच तान्ह्या बाळाची पहिली संक्रांतदेखील अशीच साजरी केली जाते. त्यालाही काळं झबलं, मुलगी असेल काळा फ्रॉक घालून हलव्याचे दागिने घातले जातात. आश्चर्य म्हणजे आजच्या आधुनिक युवतींना हा सण प्रिय आहे. अर्थात, याला कारण काही प्रमाणात आपल्या मराठी मालिकादेखील आहेत. त्यात अशा सणावारांमध्ये विविधता दाखवितात. त्यामुळे हे सण लोकप्रिय होत आहेत.
पूर्वी तर घरीच हलवा करीत असत. घरची सगळी काम संपल्यावर मंदशा निखाऱ्यावर हलक्या हाताने हलवा बनविला जात असे. त्या हलव्याचे नखशिखांत दागिने बनविले जायचे. त्यातही स्पर्धा असायची. प्रसंगी मदतदेखील मिळायची. एक खेळीमेळीची स्पर्धा असायची. बायकांची हस्तकला, कौशल्य कला दिसून यायची. घरोदारी हळदीकुंकू असायचे. सारा पौष महिना संध्याकाळभर नटलेला असायचा.
सर्वांत महत्त्वाचं काय तर आपल्याजवळचा आनंद वाटायचा. दर ऋतू बदलणारा निसर्गदेखील आपल्याकडून हीच अपेक्षा करतो. जुनं विसरायचं नवीन आपलंसं करायचं हाच आनंदी जीवनाचा मूलमंत्र होय. निसर्गात काहीच अमंगळ नाही. कोणता रंगही अमंगल नाही. काळ्या रात्रीतूनच उद्याचा तेजस्वी सूर्य उगवतो ना? म्हणूनच की काय संक्रांतीला काळ्या रंगाच येवढं महत्त्व दिलेलं आहे. संक्रांत सणाला काळ्या रंगाचे विशेषत्व बहाल करून लोकांच्या मनातील काळ्या रंगाची अभद्रता दूर केलेली आहे. कारण, सर्व निर्मिती ही देवाचीच आहे त्याच्या मनानं कोणताच भेदभाव नाही. हेच त्रिकालबाधित सत्य आहे.