-जगदीश देशमुख
आजच्या तरुणाईला त्यांच्यासमोर उद्भवलेल्या एखाद्या साध्या समस्येला सामोरे जाण्यापेक्षा त्या समस्येपासून पळ काढून जीवन संपवणे अधिक सोपे वाटते. आजची तरुणाई इतकी भित्री का झाली आहे. आजच्या तरुणाईला तणाव, स्पर्धा, शारीरिक-मानसिक वेदना सहन करून त्यातून मार्ग का काढता येत नाही.
आजच्या तरुणाईची आत्महत्या करण्याची कारणे काय आहेत तर, तिने किंवा त्याने मला नकार दिला, आई किंवा बाबा अभ्यासाला बस म्हणून ओरडले, परीक्षेत मार्क कमी आले, परीक्षेत नापास होण्याची भीती, नोकरी मिळत नाही, फेसबुकवर फोटोला लाईक कमी मिळाले यावरून तरुणाई आत्महत्या करते. याला काही अंशी बदललेली कुटुंबव्यवस्थाही जबाबदार आहे. त्रिकोणी कुटुंबव्यवस्थेत संवाद लोप पावत आहे.पूर्वी एकत्र कुटुंबव्यवस्था होती. लहान मूल चुकले तर त्याला काका, चुलतभाऊ, मोठा भाऊ कुणीही धोपटायचे त्यामुळे त्याच्यातील अहंपणा, अहंकार तेव्हाच मरून जायचा. आता पालक मुलांवर साधे ओरडतही नाहीत. त्यामुळे त्याला कुणाचे बोलणे ऐकण्याची सवयच नाही. मार तर फार दूर, म्हणून पालक कधी थोडेसे ओरडले तर लगेच अशी अतिलाडात वाढलेली मुले आत्महत्या करायला प्रवृत्त होतात.
पालक आणि पाल्यामधील संवादाची दरी ही खरी समस्या आहे. पाल्य कोणत्या समस्यांना सामोरा जात आहे का? याची माहिती पालकांना असावी. वेळोवेळी वास्तवाची ओळख पाल्याला करून देणे गरजेचे आहे. त्याशिवाय पाल्याशी जास्तीत जास्त मनमोकळा संवाद साधण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण पालक पैसे कमावण्यातच दंग आहेत. त्यांना पाल्याशी बोलायलाही वेळ नाही. पाल्याला एखादे महागडे गिफ्ट दिले की आपली जबाबदारी संपली ही मानसिकता पालकांनी बदलायला पाहिजे.
गेल्या 10 वर्षांत मानसिक तणावाच्या प्रमाणात जवळपास 6 पटीने वाढ झालीय. भारतातल्या काही शहरांत हे प्रमाण अक्षरश: हादरवून सोडणारे आहे. आज देशातील 13 टक्के तरुणाई म्हणजे जवळपास 8 कोटी तरुण-तरुणी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत. जगभरात ज्या आत्महत्या होतात त्यापैकी 10 टक्के आत्महत्या या एकट्या भारतात होतात. त्यामध्ये तरुण-तरुणींचा भरणा मोठा आहे. गेल्या दहा वर्षांत अशा प्रकरणांमध्ये 100 टक्के वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 15 ते 24 वयोगटातील तरुण-तरुणींची संख्या अधिक आहे.
वाढती स्पर्धा, तणावपूर्ण जीवनशैली आणि अपेक्षापूर्ती न झाल्याने येणारे नैराश्य या कारणांच्या बरोबरीलाच इंटरनेट आणि सोशल मीडियाचे लागणारे व्यसन हे युवकांना मानसिक ताणाच्या जाळ्यात ओढत आहे आणि त्यातून तरुणाई आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे, असे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे. कुठल्याही स्पर्धेतील यश किंवा अपयश म्हणजे जीवन नाही हा शाश्वत नियम तरुणाईने अंगीकारला पाहिजे. एखादी स्पर्धा हा जीवनाचा एक भाग आहे, पैलू आहे. जीवन त्यापेक्षा कितीतरी मोठे आहे. पालकांनी लहानपणापासूनच स्पर्धा आणि स्पर्धेतून येणारे यशापयश पचवण्याचे संस्कार करायला पाहिजेत. तसेच एका स्पर्धेतील अपयश म्हणजे शेवटचे नसते. करिअरच्या बाबतीतदेखील यश व अपयश या आयुष्याच्या दोन महत्त्वाच्या बाजू आहेत. त्यातील अनुभव आपल्याला भरपूर काही शिकवतात.
आपल्या मनासारखे घडले नाही की विरोध करणे किंवा काही टोकाची पावले उचलणे हा मानवी स्वभाव आहे. प्रेमभंगामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. तरुण वयात प्रेमातील नकारामुळे आयुष्यच व्यर्थ आहे ही भावना प्रेमाच्या उत्कटतेचा निर्देशांक नसून उतावळेपणा व अपरिपक्वता आहे. आयुष्य प्रत्येकाला पुन्हा संधी देत असते, पण एकदा संपवलेले आयुष्य पुन्हा मिळत नाही हे तरुणाईने समजणे महत्त्वाचे आहे.
प्रसारमाध्यमांचीही याबाबतीत मोठी जबाबदारी आहे. आत्महत्येच्या बातम्यांचे वार्तांकन हे दुधारी शस्त्र आहे. जागतिक आरोग्य संघटनेने माध्यमांनी आत्महत्यांचे वार्तांकन कसे करावे, याविषयी दिशादर्शक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये माध्यमांनी आत्महत्यांचे सनसनाटीकरण टाळावे, पहिल्या पानावर अशा बातम्यांना ठळक प्रसिद्धी देणे टाळावे, आत्महत्येच्या प्रयत्नाचे सविस्तर वर्णन देणे टाळावे, अशा अनेक गोष्टी सुचविल्या आहेत. त्यांचे आपल्याकडे सर्रास उल्लंघन होताना दिसते. आत्महत्यांचा प्रश्न समाजासमोर मांडताना त्याचा उलट परिणाम तर होणार नाही ना, याबाबतची संवेदनशीलता माध्यमांनी बाळगण्याची गरज आहे. काही वृत्तवाहिन्या टीआरपीच्या नादात दिवसभर आत्महत्येची बातमी दाखवतात.
महाराष्ट्र, तमिळनाडू व आंध्र प्रदेश या तुलनेने प्रगत राज्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. उच्चशिक्षित वर्गामध्ये आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. कारण तरुणांकडून असणाऱ्या अवाजवी अपेक्षा. मग अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की, तरुण आत्महत्येला प्रवृत्त होतात. जशी शारीरिक रोगप्रतिकारशक्ती कमी होते तशी मानसिक प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. अशी एखाद्याची मानसिक प्रतिकारशक्ती कमी झाली की, परिणामी आत्महत्यासारखी टोकाची पावले उचलली जातात. हे सगळे थांबवायचे असेल तर मानसिक प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे आहे.
तरुणांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी योग्य व्यक्तीची मदत घ्या. गुणवत्तापूर्ण आयुष्य जगण्यावर भर द्या. तरुणांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी कायदा, सरकार किंवा शाळा स्तरावर कार्यक्रम राबवण्याबरोबरच आपल्या सर्वांचा संवेदनशील आणि कृतिशील सहभाग आवश्यक आहे. लहानपणापासूनच असे संस्कार करा की, मुलांना स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक समजायला हवा.