मुंबई: पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांसह मुंबईसारख्या काही शहरांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. गुप्तचर यंत्रणांनी सरकारला ही माहिती दिली आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर जैश-ए-मोहम्मदने दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला आहे. देशाची आर्थिक राजधानी उध्वस्त करण्याची त्यांची योजना असू शकते. त्याच बरोबर हे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांवरील हल्ले वाढवण्यावर आपला भर देणार असल्याचेही सांगितले जात आहे.
भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान अतिरेकी गटांना प्रोत्साहन देऊ शकतो इम्रान यांच्या विधानाकडे त्या दृष्टीने पाहिले जात आहे. जे इनपुटस मिळाले आहेत त्या आधारावर मुंबई जैश-ए-मोहम्मदच्या रडारवर असू शकते असा गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे. पाकिस्तान आपल्या स्लीपर सेलला सक्रीय करेल तसेच जैशच्या तीन जणांच्या टीमवर मुंबई हल्ल्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशी गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. केंद्राने राज्य पोलिसांना महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.