नवी दिल्ली: स्वामिनाथन कृष्णमुर्ती हे नोकरीच्या निमित्ताने नायजेरियात गेले असता त्यांचे तेथे अपहरण झाले. यानंतर त्यांना मायदेशापर्यंत सुखरूप आणण्यात स्वराज यांचा सिंहाचा वाटा होता. स्वराज यांचे निधन झाल्याचे समजताच त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी आपण आज जिवंत आहोत ते केवळ सुषमा यांच्यामुळे असे म्हणत आपल्या अश्रुंना वाट करुन दिली.
स्वामिनाथन हे नोकरीच्या निमित्ताने नायजेरिया या देशात गेले. नवीन देशामधे काही समजण्याच्या आतच त्यांचे अपहरण झाले. त्यांच्याकडे तब्बल 10 मिलियन एवढ्या नायजेरियन चलनाची म्हणजेच भारतातील 37 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्याच काळात पुण्यात राहणारा त्यांचा मुलगा अमित हा त्यांना संपर्क करत होता. मात्र वारंवार त्याला न समजणाऱ्या भाषेत उत्तर मिळत होते. अखेर खुद्द स्वामिनाथन यांनी फोन उचलला आणि या प्रकाराची माहिती दिली. अचानक एवढ्या पैशांची सोय कशी करायची असा प्रश्न कटुंबासमोर होता. त्यातच अपहरण नायजेरियात आणि कुटूंब भारतात अशी स्थिती होती. यानंतर अखेर त्यांचा मुलगा अमित यांनी तत्कालीन पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी याची दखल घेत तेव्हाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क केला. स्वराज त्यावेळी जपानच्या दौऱ्यावर होत्या.
मात्र, त्याही वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देत मदतीचे आश्वासन दिले. पुढचे 48तास भारतीय परराष्ट्र खाते नायजेरियाच्या सरकारशी संपर्कात होते. स्वतः स्वराज या वेळोवेळी माहिती घेत होत्या. स्वामिनाथन नोकरी करत असलेल्या कंपनीशीही परराष्ट्र खात्याने संपर्क केला. त्यांनी गंभीर दखल घेतली नाही तर संबंधित कंपनीला भारतातून हद्दपार करू असेही सांगण्यात आले. शेवटी दबाव कामी आला आणि काही तासात त्यांची सुटका झाली. मात्र, यानंतर स्वामिनाथन नोकरी करत असलेल्या कंपनीने त्यांना भारतात परत पाठवण्यास नकार दिला. सुमारे महिनाभर त्यांचे प्रयत्न सुरु होते. स्वतः स्वामिनाथन परत येऊ इच्छित असतानाही त्यांचा पासपोर्ट कंपनी देत नव्हती. शेवटी त्यांनी पुन्हा शिरोळे आणि स्वराज यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या मध्यस्तीने ते पुन्हा भारतात येऊ शकले. आज ते पुण्यात वास्तव्य करत असून स्वराज यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांना अश्रू आवरत नव्हते. यावेळी त्यांनी स्वराज होत्या म्हणुन आज मी जिवंत आहे अशी अठवणही स्वामिनाथनयांनी सांगितली.