अतिवृष्टीत सतर्क राहण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
50 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले
पाटण बसस्थानक परिसरात घुसलेल्या पाण्याची पाहणी करताना बसस्थानकामध्ये 50 प्रवासी अडकले असल्याची बाब येथील आगारप्रमुखाने आमदार देसाई यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर आ. देसाई यांनी तातडीने कार्यकर्त्यांला फोन करुन ट्रॅक्टर मागवून घेत 50 प्रवाशांना बाहेर काढून साळुंखे हायस्कूल येथे सुखरुप स्थलांतरित केले.
सणबूर – कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असून पावसाचे प्रमाण वाढत आहे. ठिकठिकाणी कोयना नदीचे पाणी मुख्य रस्त्यावर शिरले आहे. त्यामुळे तातडीचे अत्यंत महत्वाचे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, अशी विनंती आमदार शंभूराज देसाई यांनी जनतेला केली आहे. कोयना धरणातून दोन-दोन तासाला जादाचे पाणी सोडण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने पूरपस्थितीवर नियंत्रण करण्याकरीता तालुक्यातील प्रशासन सज्ज आहे. पोलीस यंत्रणेला स्ट्रायकींग फोर्स यासारखी जादा पोलीस पाठविण्या संदर्भात वरीष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
पाटण शहरात कोयना नदीचे ठिकठिकाणी घुसलेले पाणी पाहण्याकरीता तसेच पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण शहरातील मुख्य रस्त्यासह पाणी घुसलेल्या ठिकाणांची पहाणी केली. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे या प्रमुख अधिकाऱ्यासंह विविध खात्यांचे तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
आ. शंभूराज देसाई यांनी पाटण येथील धांडे पूल तसेच एस. टी स्टॅन्ड व लायब्ररी चौक येथे कोयना नदीतून घुसलेल्या व मुख्य रस्त्यावर पहाणी करताना शहरातील नागरिक, महिला लहान मुलांसह रस्त्यावर पुराचे पाणी पाहण्यासाठी येत आहेत, हे चुकीचे असल्याचे प्रशासनास निर्दशनास आणून दिले. अत्यंत महत्वाचे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच जिथे पाणी जादा प्रमाणात आहे तिथे जाणे टाळावे. कोयना धरणात पावसाचे प्रमाण जादा असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होत आहे. त्यामुळे दर दोन तासाला धरणातील पाणी सोडण्याचे प्रमाणही वाढविण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
मुख्य रस्त्यावरील पाण्यामध्ये युवक दुचाकी घेवून जात आहेत. पोलीस यंत्रणांनी अशा ठिकाणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमणूका करुन स्टंटबाजी करणाऱ्या युवकांना रोखावे. नागरिकांनीही तालुका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच नावडी, मंद्रुळहवेली, जमदाडवाडी, मळावस्ती या गावांमध्येही कोयना नदीचे पाणी शिरले आहे. नावडी गावचा संपर्क तुटलेला असून शासकीय अधिकाऱ्यांनी येथे सतर्क रहावे, अशा सुचना त्यांनी केल्या. तसेच सांगवड येथील सिध्देश्वर मंदीराच्या मागील बाजूच्या खचलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी केली.