ना. दीपक पवार यांचे प्रतिपादन
केळघर – पक्ष कोणाला तिकीट देईल काय होईल माहित नाही, मात्र मी सुद्धा पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे, परंतु पक्ष देईल तो निर्णय मान्य करणार असून सातारा जावली मतदार संघाचा आमदार हा भाजपाचाच असेल असे प्रतिपादन ना. दीपक पवार यांनी केले. नांदगणे (ता. जावली) येथील कुसुंबी गटाच्यावतीने दीपक पवार यांची पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री) निवड झाल्याबद्दल सत्काराचे व कुसुंबी गट, बुथप्रमुख,शक्तीकेंद्र यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजपाचे उपजिल्हाप्रमुख बुवासाहेब पिसाळ, जिल्हा महिला अध्यक्षा गीताताई लोखंडे, उद्योजक विजय शेलार, तालुका अध्यक्ष दत्ताजी साळुंखे, वसंतराव शिंदे, सागर देशमुख, शेखर वाटणे, मोहनराव कासुर्डे, राघव बिरामणे, एम. एस. पार्टे, अंकुश बेलोशे, साहेबराव पवार, साहेबराव शेलार, विजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दीपक पवार म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत भाजपाकडून विधानसभेचे तिकीट मिळाल्यावर प्रचाराला अवघे 12 दिवस मिळाले होते. मतदार संघातल्या प्रत्येक गावातसुद्धा जाता आले नाही तरीसुद्धा मला 54,000 मते मिळली होती. फार कमी वेळ मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून भाजप पक्षाचे काम चालू केले. पक्षाच्या आदेशाप्रमाणे सातारा जावली मतदार संघात पक्ष मजबूत केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व मंत्रीमंडळातील इतर मंत्र्यांच्या माध्यमातून मतदार संघात भरीव निधी आणला आहे.
या पक्षाच्या माध्यमातून या विभागातील बोंडारवाडी धरण 100 टक्के पूर्णत्वास नेणार असून मी स्वतः दोन वेळा मुख्यमंत्र्यांना भेटून सविस्तर चर्चा केली आहे व तसे मुखमंत्र्यांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पास होकार दर्शवला असल्याचे सांगून या प्रकल्यामुळे 54 गावाचा पिण्याचा प्रश्न 100 टक्के निकाली निघणार असल्याचे दीपक पवार यांनी सांगितले.
यावेळी कुसुंबी जि. प. गटातील भाजप कार्यकर्ताच्यावतीने व दीपक पवार मित्रसमूहाच्यावतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध गावचे सरपंच, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जावली तालुका खादी ग्रामोद्योगचे व्हा. चेअरमन अंकुश बेलोशे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.