भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरील ऊसतोड कामगार व त्यांचे कुटुंब लॉकडाऊनमुळे गेल्या 14 दिवसांपासून कारखाना कार्यस्थळावर अडकून बसले होते. अखेर साखर आयुक्तांचे पत्र रविवारी (दि. 19) कारखान्याला प्राप्त झाल्यानंतर या 4 हजार 448 व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आपल्या मूळ गावी परत पाठवण्यात आले.
ऊसतोडणी मजूर व त्यांच्या कुटुंबाला मूळ गावी जाण्यासाठी निघालेल्या गाडीला हिरवा झेंडा कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या हस्ते दाखवण्यात आला.
दरम्यान, या ऊसतोड मजूरांचे व त्यांच्या कुटुंबांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर संबंधितांना न्युमोनिया सारखे किंवा तत्सम किंवा ताप, खोकला आदी लक्षणे नाहीत. याबाबतचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याचे कारखान्याच्यावतीने सांगण्यात आले.