फुरसुंगी – भय इथले संपत नाही…, पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका ते लक्ष्मी कॉलनी दरम्यान भाजीपाला विक्री करणाऱ्यांना पोलीस यंत्रणेने आवर घालण्याची गरज आहे. वाहने रात्रंदिवस उभी करून भाजी विक्री केली जात असून येथे मोठी गर्दी होत असल्याने यातून करोना बाधित वाढण्याचा धोका आहे.
प्रशासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला, फळ विक्रीस मुभा देण्यात आली आहे. परंतु, याचा फायदा शेतकरी नव्हे दलाल व्यापारी घेत असून अशांनीच लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाट टोलनाका दरम्यान बाजार मांडला आहे.
शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने माल विकत घेवून असे भाजी विक्रेते लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांची लूट करीत आहेत. गेल्या आठवड्याभरापासून पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी भाजीपाला विक्रेते रात्री-अपरात्री टेम्पो घेऊन गल्लीबोळात फिरू लागले आहेत. ही बाब लक्षात आल्याने नागरिकांनी गल्लीबोळ काठ्या, जुने पाइप लावून बंद केले आहेत. तरीसुद्धा हे नागरिवस्तीपर्यंत पोहोचून भाजीविक्री करण्याचा प्रयत्न दलाल मंडळी करीत असल्याने सर्वांचीच डोकेदुखी वाढली आहे.
फेरीवाल्यांकडून खरेदी नको…
पुणे-नगर महामार्गावरील वडगावशेरी आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारातील कोरोना बाधितांची संख्या हडपसरची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच एक पाऊल पुढे टाकून स्वतः काही बंधने घालणे गरजेचे आहे. यासाठी कोणत्याही टेम्पोवाल्याकडून भाजीपाला, फळ खरेदी करणे टाळणे गरजेचे आहे.