पालिका आरोग्य सेवेच्या पहिल्या टप्यातच त्रुटी; रुग्ण वाहतुकीची स्थिती गंभीर
– हर्षद कटारिया
बिबवेवाडी – करोना बाधित रुग्णांची संख्या शहरात वेगाने वाढत असून अशा व्यक्तीस रुग्णालयात घेऊन जाण्यास येणाऱ्या रुग्णवाहिकशी संपर्क साधल्यानंतरही होणारा उशीर रुग्णाच्या जीवावर बेतत आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचे सांगितले जात असले तरी प्राथमिक टप्यावरच अशा प्रकारच्या त्रुटी आढळून येत असल्याने नागरिकांतून महानगरपालिका तसेच आरोग्य प्रशासनाच्या सेवेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
महर्षीनगर येथे एका व्यक्तीचा मृत्यू (शुक्रवार, दि. 17) पदपथावर झाला. कुठल्याशा आजाराने त्रस्त असलेली ही व्यक्ती संध्याकाळी सहा वाजता पोलिसांशी संवाद साधते. महर्षीनगरचे पोलीसही याची तातडीने दखल घेत. 180 क्रमांवर रुग्णवाहिकेशी संपर्क साधतात. मात्र, त्यानंतर त्याच पदपथावर रात्री 11:00 वाजेपर्यंत संबंधीत व्यक्तीचा मृतदेह पडून राहतो, मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनीही मोठी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनीच नव्हे तर तेथे उपस्थित अनेकांनी तातडीने संपर्क साधूनही रुग्णवाहिका येण्यास बराच उशीर झाल्याचे सांगण्यात आले. रुग्णवाहिका तसेच पालिकेचा संबंधीत विभाग, रुग्णालय यांचा संवाद नसल्याने अशा घटना घडत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पद्मावती येथे सातारा रस्त्यावरही असाच प्रकार अनुभवास आला. एका व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे तो जिवाच्या अकांताने ओरडत होता, जोरात खोकत होता. हे पाहून रात्री 11:00 वाजता काही स्थानिक कार्यकर्त्यांनी 108 क्रमांकावर फोन केला, सतत फोन केल्यानंतर रुग्णवाहिका येत असल्याचे सांगण्यात आले.
या दरम्यानच्या काळात अन्य ठिकाणीही खासगी रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न करण्यात आले. परिसरातील डॉक्टर नितीन बोरा यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखत अनेक प्रयत्न केले. मात्र, करोना रुग्णास घेऊन जाणारी रुग्णवाहिका रात्री 2:00 वाजता आली तो पर्यंत रुग्ण एका जागी तडफडतच होता.
तर, असाच तिसरा प्रसंग गुलटेकडी औद्योगिक वसाहत मध्ये घडला ज्येष्ठ महिलेला छातीत दुखत असल्याने नागरिकांनी रुग्णवाहिकेस संपर्क केला. मात्र, सुमारे दोन तास रुग्णवाहिका आली नाही. स्थानिक पातळीवर प्रयत्न करुन स्थानिक दवाखान्यातील रुग्णवाहिका बोलावण्यात आली. संबंधीत महिलेस रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचार सुरू झाल्यानंरतही शासकीय रुग्णवाहिका आली नाही, असे प्रत्यक्षदर्शी ललित तींडे यांनी सांगितले.
रस्ते मोकळे तरी उशीर…
लॉकडाऊनमुळे रस्ते मोकळे पडले आहेत, शहराच्या कोणत्याही भागात पोहचायचे असेल तर 20 ते 25 मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागू शकत नाही. अशा स्थितीतही रुग्णवाहिका वेळेत येत नसल्याने एक तर करोना रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या कमी असावी किंवा करोनामुळे अशी सेवा देण्यास संबंधीत चालक घाबरत असावेत. रुग्णांचे जीव वाचवायचे असतील तर रुग्णवाहिका वेळेत पोहचणे गरजेचे आहे, अशी चर्चा नागरिकांत आहे.