उसाच्या फडात पाणी : कामगारांच्या झोपड्यांमध्येही ओलावा
नीरा – कष्ट पाचवीला पुजलेल्या ऊस तोडणी कामगारांची सोमवारी (दि. 17) पावसामुळे मोठी दैना झाली. उसाच्या फडात आधीच पाणी असल्याने ऊस तोडणी व छाटणी जिकरीचे बनले असतानाच, सायंकाळी ट्रॅक्टर ट्रॉली भरण्याआधी पावसाने जोरदार सुरुवात केल्याने ऊस फडातून बाहेर काढण्याची मोठी कसरत करावी लागली. यादरम्यान तोडणी कामगारांचे मोठे हाल झाले.
परतीच्या पावसाने गेली आठवडाभर दमदार हजेरी लावली आहे. ऊस बागायत पट्ट्यातील उसाच्या फडात पाणीसाठून आहे. शनिवार (दि. 15), रविवार (दि. 16) साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या ऊस पट्ट्यात दाखल झाल्या आहेत. या टोळ्यांकडून आता ऊस तोडणी ही सुरू झाली आहे. पहाटे ऊस तोडला जातो व दुपारनंतर तो वाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रॉलीमध्ये भरला जातो. याच दरम्यान पाऊस येत असल्याने ऊस तोडणी कामगारांचे काम जिकरीचे होत आहे यात महिलांचे जास्तीचे हाल होत असतात.
आधीच उघड्यावर असलेला संसार त्यात पावसाची भर यामुळे ऊस तोडणी कामगार यावर्षी प्रचंड चिंतेत आहे. ऊस गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच असा पाऊस बरसत असल्याने त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत आहे. भरमसाठ उचल घेतलेले हे कामगार कष्टाच्या तयारीत असतात मात्र नैसर्गिक आपत्ती पुढे ते तग धरू शकत नाहीत.
दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतर रात्री झोपडीत झोपणेही आता कठीण झाले आहे. आठवडाभर पडलेल्या पावसामुळे नीरासह परिसरातील जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांच्या चोपड्यांमध्ये ही ओलावा निर्माण झाला आहे.