पुणे – राज्यात गेल्या वर्षी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. त्याचा फायदा ऊस उत्पादनाला झाला आहे. परिणामी, यंदा राज्यात 15 फेब्रुवारीपर्यंत 861.53 लाख क्विंटल साखेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. साखर सहसंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, 197 साखर कारखान्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत 845.23 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 861.53 लाख क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 10.18 टक्के आहे.
यावर्षी 15 ऑक्टबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यात आला होता. त्यानंतर 197 साखर कारखान्यात उसाचे गाळप सुरू झाले आहे. यात 98 सहकारी आणि 99 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. सोलापूर विभागात सर्वाधिक 46 कारखाने सुरू झाले असून 14 फेब्रुवारीपर्यंत सर्वाधिक 198 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर, कोल्हापूर विभागात सर्वाधिक 229 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
चालू गाळप हंगामात विक्रमी उसाचे गाळप झाले असले तरी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. त्यामुळे त्या दृष्टीने साखर कारखाने आणि आयुक्तालयाकडून ऊस गाळपाचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनाकडून होत आहे. दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने बंद करू नये, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायवाड यांनी दिले आहेत.