अबोहार –पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यानी केलेल्या “यूपी, बिहार और दिल्ली के भैय्ये’ या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोरदार प्रहार केला. कॉंग्रेसची ही भेदाची मानसिकता असल्यामुळे त्यांना पंजाबमध्ये राज्य करण्याचा अधिकार नाही, अशी टीका पंतप्रधानांनी केली. पंजाबच्या सार्वत्रिक विकासासाठी जनतेने भाजपच्या आघाडीला निवडणूकीत विजयी करावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
पंजाबमध्ये आलेलेल उत्तर प्रदेश आणि बिहारचे बंधू काहीही काम करत नसल्याचे चन्नी यांच्या बोलण्यातून भासवले जाते आहे. संत रविदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातच झाला होता. तर गुरू गोविद सिंग यांचा जन्म बिहारमध्ये झाला होता. मग त्यांच्या अनुयायांना पंजाबातून बाहेर काढणार का? असा प्रश्नही पंतप्रधानांनी विचारला.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी भाजपच करत आहे. कॉंग्रेसनेच शेतकऱ्यांचा आतापर्यंत विश्वासघात केला आहे. कॉंग्रेसच्या धोरणांमुळेच पंजाबात अद्याप कोणीही गुंतवणूक करत नव्हते. डबल इंजिनच्या धोरणामुळेच राज्याची प्रगती होणे शक्य आहे, असेही पंतप्रधानांनी जोर देऊन सांगितले.
चन्नी यांचे वादग्रस्त वक्तव्य
चन्नी यांनी मंगळवारी एका रोड-शो दरम्यान “यूपी, बिहार आणि दिल्लीच्या भैय्यांना पंजाबात प्रवेश करू देऊ नये.’ असे वादग्रस्त विधान केले होते. दिल्लीतील आम आदमी पार्टी पंजाबात सत्तेची प्रमुख दावेदार ठरत असल्यामुळे त्यांनी हे विधान केले होते. रुपनगरमधील रोड शो दरम्यान चन्नी हे विधान करत असताना त्यांच्या मागे बसलेल्या कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा या टाळ्या वाजवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचा संदर्भही मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये दिला.