ठाणे – आरक्षणाच्या प्रश्नावरुन राज्य सरकारने मराठा समाजातील तरुणांची फसवणूक केली आहे. आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा पेढे वाटणारे भाजपचे नेते आता कुठे आहेत? अशा खास शैलीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला. राज्यातल्या स्थानिक तरुणांना नोकरीची संधी मिळाली, तर आरक्षणाची गरजच लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिबिरावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दुष्काळासाठी राज्य सरकारने काय काम केली? असा खडा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. जर सरकारने कामं केली, तर दुष्काळ जाहीर का करावा लागला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दुष्काळाचा भीषण प्रश्न का निर्माण झाला? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या.
दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे, तर मग तो खर्च का करत नाही? अशा प्रश्नांचा त्यांनी भडीमार केला.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकबाबत जे वक्तव्य केले. त्यावरुन देशाची खिल्ली उडवली जाते, असा घणाघातही केला. मोदी सरकारविरोधात मी बोलतो आहे. कारण त्यांनी काम केली नाहीत. स्वप्न दाखवून त्यांनी भ्रमनिरास केला. जर कामं केली नाहीत तर कोणतंही सरकार असो त्याविरोधात बोललेच पाहिजे. कॉंग्रेसच्या सरकारने कामं केली नसती तरीही मी हेच बोललो असतो, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनसेच्या शिबीराच्या निमित्ताने राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे प्रचार केला पाहिजे, कोणते मुद्दे घेतले पाहिजेत, तसेच संघटनात्मक पातळीवर नेतृत्व बदलाच्या हालचालीबाबतही चर्चा केली.