पश्चिम बंगाल – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोनार बांगला’चे रुपांतर कंगाल बांगला’मध्ये केले असल्याची टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. पूर्वी लोक बंगालमध्ये रविंद्रनाथ टागोर यांचे संगीत ऐकत असत. मात्र हल्ली पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकायला मिळत आहेत. ममता दीदींनी सोनार बांगला’चे रुपांतर कंगाल बांगला’मध्ये केले आहे.’ असे अमित शहा म्हणाले.
पश्चिम बंगालमधील घुसखोर ममता दीदींना घाबरवतात. केवळ व्होटबॅंकेसाठी ममता दीदी दुर्गापूजा आणि सरस्वती पूजेला परवानगी देत नाही. जर नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर कोणालाही दुर्गा पूजा आणि सरस्वती पूजेला विरोध होणार नाही, असे शहा म्हणाले.
“जय श्रीराम’ असे म्हणण्यासही ममता बॅनर्जींनी मज्जाव केला आहे. घुसखोरांच्याच सांगण्यावरून ममता बॅनर्जींनी “जय श्रीराम’ म्हणण्यास मज्जाव केला आहे. तसे म्हटले की ममता दीदींना राग येतो. मी “जय श्रीराम’ म्हणतो, मला अटक करून दाखवा, अशा शब्दात अमित शहा यांनी ममता बॅनर्जींना आव्हान दिले.