बारामती/ जळोची – शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिनाभरात दोन बालकांवर हल्ला करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचना करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. यावरून प्रशासकीय यंत्रणा गाफील असल्याचे दिसत आहे. खत्री इस्टेटमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक साडेतीन वर्षांचे बालक जखमी झाले आहे. (दि.16) दुपारी ही घटना घडली.
युवान केदार जाचक (रा. खत्री इस्टेट, कॅनॉल रोड, बारामती) असे जखमी बालकाचे नाव आहे. याच भागात महिन्याभरातील लहान बाळांवर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना घडल्याने स्थानिक नागरिकांच्या संतापसह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युवान हा अंगणात खेळताना चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर अचानकच हल्ला चढवला. त्याच्या हातापायांना जोरदार चावा घेतला. काही क्षणातच स्थानिक नागरिक तसेच त्याचे पालक धावून आल्याने कुत्री पळून गेली.
मात्र, यात युवान कमालीचा घाबरला होता. त्याला तातडीने बालरोगतज्ज्ञ डॉ.सौरभ मुथा यांच्याकडे पुढील उपचारासाठी पालकांनी नेले. दरम्यान, त्याची प्रकृती स्थिर असून त्याला काही इंजेक्शन्स द्यावी लागतील, अशी माहिती डॉ. मुथा यांनी दिली. गेल्या महिन्यात याच भागात आश्वी जगदाळे या मुलीला कुत्र्यांनी वीस ठिकाणी चावे घेत जखमी केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा त्याच ठिकाणी युवान जाचक याला जखमी केले आहे. या घटनेने आता लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
निर्बिजीकरण केंद्राचे काम दोन दिवसांत सुरू
मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले की, वर्षभरापासून नगरपरिषद टीम भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांवर काम करीत आहे. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केंद्र उभारले आहे. परवानगी मिळाली की 2 दिवसांत तिथे काम सुरु होत आहे. तेथे आपण सीसीटीव्ही यंत्रणा उभारणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे.
शहरात काही ठिकाणी उघड्यावर अन्न टाकले जाते. काही हातगाडेवाले देखील भटक्या कुत्र्यांना उरलेले अन्नपदार्थ खाण्यास देतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी उघड्यावर अन्न टाकू नये. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढत आहे.