इंदापूर – नीरा-भीमा कारखान्यात काय काय चालले आहे. कुणाला माहिती आहे का? मध्यंतरी, काट्याचा प्रकार कसा या कारखान्यांमध्ये चालतो, हे क्लिप च्या माध्यमातून पाहिले आहे. शेतकरी या चुका सहन करणार नाही. कारखान्याचा काटा मारण्याचे पाप कुणी करत असेल तर शेतकरी सोडणार नाही. मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. संघर्ष आगामी काळात अटळ आहे. शेतकऱ्यांसाठी पाठीमागे हटणार नाही असा इशारा जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता दिला.
नीरा भीमा साखर कारखान्यावर आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समिती यांच्या माध्यमातून आज (बुधवारी) आत्मक्लेष पदयात्रा लाखेवाडी येथून शहाजी नगर कारखाना कार्यस्थळापर्यंत काढण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, दत्तात्रय घोगरे, प्रशांतराव पाटील, ऍड. राहुल मखरे, हनुमंत कोकाटे, अतुल झगडे, शुभम निंबाळकर, सचिन सपकळ, सागर मिसाळ, संग्रामसिंह पाटील, सचिन देवकर, शेतकरी संघर्ष समितीचे धैर्यशील पाटील, पंडितराव पाटील, महादेवराव घाडगे, अजित टिळेकर, विजय गायकवाड, तुकाराम घोगरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहाजीनगर कारखाना चौकात पोलीस प्रशासनाने पदयात्रेस रोखले. त्यामुळे काही कालावधीत कारखाना प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी, शेतकरी संतप्त भावनेने करत होते; मात्र आप्पासाहेब जगदाळे व त्यांचे सहकारी भर उन्हात कारखान्याच्या गेटसमोरच ठाण मांडून बसल्याने, अखेर पोलीस प्रशासनाने कारखान्याच्या समोरील बाजूस आपल्या भावना मांडू दिल्या. कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे तसेच संचालक मंडळाने शेतकरी संघर्ष समितीचे निवेदन स्वीकारले व कारखान्याच्या वतीने आंदोलकांना मागण्या मान्य करत असल्याचे लेखी निवेदन सादर केले.
आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्यामुळे सहकारी संस्था उभ्या राहिल्या. स्व. भाऊ असताना चांगले कारखाने चालले, माजी आमदार गणपतराव पाटील, कै. गोकुळशेठ शहा यांचे तालुक्यामध्ये मोठे योगदान आहे. जिल्हा बॅंकेवर काम करत असल्यामुळे मागील कालावधीत व आज देखील आम्ही जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून या दोन्हीही साखर कारखान्यांना मदत करत होतो. तरीदेखील मदत केली नाही अशी म्हणणारी अवलाद आमच्यात नाही.
16 जानेवारीला आमदार दत्तात्रय भरणे मामा यांच्याबरोबर मी चर्चा केली आणि कर्मयोगी साखर कारखान्याला दोनशे कोटी रुपये मंजूर करून दिले. साखरेची पोती कमी असताना साडेचार लाख साखरपोती कारखान्यामध्ये उपलब्ध आहेत, असे लेखी पत्र जिल्हा बॅंकेला कर्मयोगी कारखान्याने दिले. परंतु प्रत्यक्षात साखर पोती मोजली गेली तेव्हा दोन लाख तीस हजारच भरली. बाकीची पोती कुठे गेली हे त्यांना देखील माहिती नाही.
पाच जूनची डेडलाइ
शेटफळच्या सभेत बिल देतो म्हणून जाहीर केले. मिळाले का शेतकऱ्यांना बिल, त्यामुळेच सामान्य शेतकरी यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. पाच तारखेपर्यंत कामगारांचा पगार व शेतकऱ्यांची बिले अदा करावीत अशीच आमची मागणी आहे. जर कारखान्याने दिलेल्या वेळेत कामगारांचे पगार व शेतकऱ्यांची बिले झाली नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल असाही इशारा जगदाळे यांनी दिला.
लहानपणापासून ओळखतो लबाडंच आहेत
शेतकऱ्यांच्या उसाचे बिल व कामगारांचा पगार दिला पाहिजे. लबाडाचा निमंत्रण जेवण्याचे खरं असतं का, मागील कालावधीतील कार्यकारी संचालक नवले यांनी हजारो शेतकऱ्यांच्या समोर सभासद करतो असे लेखी पत्र दिले होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी कारखान्याकडे शेअर्स रकमा भरल्या लगेच सभासद करून घेतले जातील फक्त निवडणूक लावू नका अशी दिशाभूल आमची त्यावेळी केली. अजून सभासद करून घेतले नाहीत. दिवंगत नेते पापा घोगरे यांनी हर्षवर्धन पाटील लबाड आहेत, मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. असे मला ठणकावून सांगितले होते; परंतु मीच पापा घोगरे यांची समजूत काढली होती, असा गौप्यस्फोट जगदाळे यांनी केला.