नगर -जिल्ह्यात अन्नधान्य वितरण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार चालू असून, नागरिकांची नवीन शिधापत्रिकेसाठी लूट केली जात असल्याचा आरोप करीत तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने असंघटित कामगारांना सवलती देण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने पत्रकार चौक येथील शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करण्यात आले.
यावेळी स्वस्त धान्य दुकानाचे नामकरण फस्त धान्य दुकान करुन उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या उपोषणात संघटनेचे अध्यक्ष विलास कराळे, सरचिटणीस गोरख खांदवे, प्रकाश घोलप, छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे, सुमेधा शेजुळ, अविनाश पाचारे, रावसाहेब काळे, राजू काळे, नंदकुमार गायकवाड, प्रकाश गोसावी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये अन्नधान्य वितरण व्यवस्थेमध्ये सावळा गोंधळ चालू असून, रेशन दुकानदार व संबंधित अधिकारी संगनमताने गोरगरीब नागरिकांसाठी आलेले धान्य काळ्याबाजारात विकत आहेत. जिल्ह्यात काळ्याबाजारात जाणारे धान्य पकडण्यात आले असून, यासंदर्भात अनेक पोली स्ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील काळा बाजार थांबवावा व यासाठी ठोस उपाय शोधावे, शिधापत्रिकाधारकांची आर्थिक लूट थांबवावी, सरकारने घरेलू कामगार, टेलर्स दुकानात काम करणारे कामगार, खाजगी वाहन चालक, शेतमजूर, बांधकाम कामगार, यांना 10 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, महाराष्ट्र सरकारने तमिळनाडूच्या धर्तीवर असंघटित कामगारांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी तर मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, प्रत्येक कामगारांना विम्याचे संरक्षण देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या उपोषणाला अखिल भारतीय छावा संघटना व छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.