मधुमेहासारखे अनेक विकार जडण्याचे प्रमाण होते कमी
वॉशिंग्टन: साधारणपणे कौटुंबिक स्वास्थ्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. आता एका नवीन संशोधनाप्रमाणे, पती आणि पत्नीमध्ये जरी भांडणासारखे संबंध असले किंवा प्रेमासारखे संबंध असले तरी या दोन्ही परिस्थितीमध्ये जर ते एकत्र राहत असतील तर अनेक रोगांना दूर ठेवू शकतात. मधुमेहासारखे घातक विकारही एकत्र राहणारे लोक बाजूला ठेवू शकतात.
ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखाप्रमाणे, पती आणि पत्नी यांचे संबंध जरी सौहार्दपूर्ण नसले आणि त्यांच्यामध्ये वाद विवाद होत असले तरी आणि हे दोघे जर एकत्र राहत असतील तर निश्चितच त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी राहते. दुसरीकडे जर घटस्फोटामुळे किंवा अन्य कारणांमध्ये पती-पत्नी वेगळे राहत असतील तर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच त्यांना मधुमेहाचा जास्त धोका असतो.
ओटावा युनिव्हर्सिटीतील कॅथलिन फॉर्ड यांनी याबाबत संशोधन केले असून 50 ते 90 या वयोगटातील 3300 पेक्षा जास्त नागरिकांचे त्यांनी संशोधन केले. जे लोक एकत्र राहत होते त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असल्याचे त्यांना आढळले. विवाह झाल्यानंतर सुद्धा विविध कारणांनी वेगळे राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त असते, असेच त्यांना रक्तदाबाचा ही विकार होऊ शकतो. विवाहित पुरुषाचे सर्वसाधारण आयुरमान हे अविवाहित पुरुषापेक्षा दहा वर्षांनी जास्त असते असेही या संशोधनात म्हटले आहे.
डॉक्टर क्रिस एम यांनी हाऊ डज मॅरेज ऍफेक्ट फिजिकल अँड सायकॉलॉजिकल हेल्थ या लेखांमध्ये सुद्धा याच प्रकारच्या संशोधनाचा उल्लेख केला आहे. विवाह झालेल्या व्यक्तींपैकी महिलांपेक्षा पुरुषांचे मानसिक आरोग्य जास्त चांगले असते असे या संशोधनातून समोर आले आहे. म्हणजेच विवाहाचा जास्त फायदा पुरुषांना होतो. एकत्र राहणाऱ्या जोडप्यांमध्ये चिंताग्रस्तपणाही नसतो त्यामुळे त्यांच्यामध्ये डिप्रेशनसारखा विकार होण्याची शक्यताही कमी असते. पती आणि पत्नीमध्ये वैवाहिक संबंध आणि मानसिक संबंध जर व्यवस्थित असतील प्रतिकारक क्षमता ही वाढलेली असते असे या संशोधनातून समोर आले आहे.