मंचर येथे शिवसैनिकांचा मेळावा
मंचर – राज्यात महिलांवर अन्याय, अत्याचार होत असून त्याकडे कोणाचे लक्ष नाही. विकासकामांपेक्षा विकासकामांच्या जाहिरातींवरच सरकार अधिक खर्च करीत आहे. राज्यातील प्रश्नांवर सरकार बोलण्यास तयार नाही, अर्ध्या महाराष्ट्रात पाऊस नसल्याने दुष्काळी स्थिती आहे. गॅस-डिझेल गाडीच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, सरकारच्या याकडे लक्ष नाही अशी टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आंबेगाव तालुका यांच्या वतीने मंचर येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी अंधारे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना घडवले असून देवेंद्र फडवणीस यांनी कुठलाही नेता घडवला नाही. त्यांनी दुसऱ्या पक्षातील रेडीमेड माल उचलून आपल्या पक्षात घेतला. त्यामुळे त्यांना चाणक्य म्हणता येणार नाही.
देशात वन नेशन, वन इलेक्शन’ची नाही, तर “वन नेशन, वन एज्युकेशन’ची गरज आहे. यावेळी शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनीही राज्य सरकारवर टीका केली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, जिल्हा संघटक अविनाश रहाणे, राजाराम बाणखेले, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवळे, तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे,
माऊली खंडागळे, विजया शिंदे, नित्यानंद येवले, दिलीप पवळे, विकास जाधव, हेमंत एरंडे, भरत मोरे, सुरेखा निघोट, वसंतराव बांनखेले, संजय चिंचपुरे यांसह पक्षाचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप वाबळे यांनी केले, तर दत्ता गांजाळे यांनी आभार मानले.