मुंबई – राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे ओळखून अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतंच “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी (कोकमठाण) या 520 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित शिर्डी ते मुंबई हा रस्ता जुलै 2023पर्यंत खुला करण्यात येणार आहे. या महामार्गामध्ये राज्यातील दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांचा समावेश असून, सहापदरी असलेल्या या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे.
दरम्यान, आता पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं असून, हा महामार्ग प्रवासी नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळेच आज पासून (दि. 15) या महार्गावर आता नागपूर ते शिर्डी बससेवा सुरू करण्यात येत आहे. या बसमध्ये प्रवाशांना 2X1 पध्दतीची 30 आसने बसण्यासाठी उपलब्ध असून 15 शयन आसनं आहेत.
नागपूर आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 9 :00 वाजता बस सुटेल आणि पहाटे 5.30 वाजता ठराविक ठिकाणी पोहोचेल. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात 102.5 किलोमीटर आणि वेळेमध्ये 4.15 तास बचत होणार आहे. या बससेवेसाठी 1300 रुपये तिकिट आकारण्यात येणार आहे. मुलांसाठी 670 रुपये, 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठांना तिकिटात 50 ट्क्के सवलत आणि 75 वर्षांवरील प्रौढांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे.