मुंबई – करोनाच्या धोक्यामुळे केवळ क्रीडा स्पर्धांनाच फटका बसलेला नाही तर आता राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची प्रक्रिया देखील लांबणीवर पडणार आहे. या पुरस्कारांसाठी आता येत्या मे महिन्यात अर्ज मागविले जाणार आहेत.
क्रीडा पुरस्कारांसाठी दरवर्षी एप्रिल महिन्यात अर्ज मागविण्यात येतात. प्रत्येक वर्षी 29 ऑगस्टला पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. मार्चपासून करोनाचा प्रसार झाला व त्यानंतर हा धोका दिवसेंदिवस वाढत गेला त्यामुळे क्रीडा स्पर्धाच नव्हे तर देशातील सर्व कार्यालये बंद करण्यात आली. त्यात क्रिकेटसह सर्वच क्रीडा संघटनांचीही कार्यालये बंद करण्यात आली. त्यामुळे सरकारने पुरस्कारांबाबत परिपत्रक देखील काढले नव्हते. आता पुढील महिन्याच्या सुरुवातीला हे परिपत्रक काढले जाणार असून त्यानंतर निश्चित केलेल्या मुदतीत खेळाडूंना अर्ज दाखल करावे लागणार आहेत.