मुंबई – उत्तेजक द्रव्य सेवन समितीने बंदी घातलेले औषध घेतले गेल्याने माझ्यावर 8 महिन्यांचे निलंबन लावण्यात आले त्यावेळी मला क्रिकेटपासून दूर राहावे लागले. त्यातून सावरत असतानाच करोनाचा धोका वाढल्याने पुन्हा एकदा खेळापासून दूर रहावे लागत आहे. ही सर्व परिस्थिती पाहिली की खूप निराशा येते. मानसिक छळ सुरु आहे का असेच वाटते, अशा शब्दात नवोदित क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने आपली नाराजी व्यक्त केली.
मुंबईच्या क्रिकेटचे भविष्य अशी ओळख निर्माण केलेल्या पृथ्वीवर बीसीसीआयने उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्याने 8 महिन्यांचे निलंबन लावले. त्यानंतर जोरदार पुनरागमन करत त्याने रणजी स्पर्धा गाजविली. त्यानंतर त्याला भारतीय संघात पुनरागमनही करता आले. सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच करोनाचा धोका वाढला आणि सर्वच स्तरावरील क्रिकेट थांबले. तसेच देशात लॉकडाऊन झाल्यामुळे ही परिस्थिती कधी सुधारेल हे देखील अद्याप स्पष्ट झाले नसल्याने पृथ्वीने घरात बसून राहण्याला मानसिक छळ सुरु असल्यासारखे वाटते असे सांगत सर्वच खेळाडूंना आता कधी एकदा स्पर्धा सुरु होत आहेत याची प्रतीक्षा आहे, असेही त्याने सांगितले.
प्रशिक्षक किंवा वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला न घेता स्वतःच्याच मनाने मी औषध घेतले ही माझी सर्वात मोठी चूक होती. त्याची शिक्षाही मला मिळाली. आता माझे डोळे उघडले असून भविष्यात अशी चूक कधीही करायची नाही असा पण मी केला आहे. निलंबनाचा काळ कारकीर्दीतील सर्वात कठीण काळ होता. त्यातून सावरल्यानंतर आता पूर्ण जबाबदारीने कामगिरी करायची हेच ध्येय ठेवले व त्यात यशस्वीही झालो. आता माझी कामगिरी सातत्यपूर्ण कशी होईल यावर मी सातत्याने मेहनत घेत आहे, असेही पृथ्वीने व्यक्त केले.
द्रविड सरांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले
निलंबनाचा काळ तसेच दुखापतीतून सावरण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झालो त्यावेळी राहुल द्रविड सरांनी केलेले मार्गदर्शन माझ्या कारकीर्दीला कलाटणी देणारे ठरले. प्रत्येक खेळाडूला त्याची चूक दाखवून देतानाच त्यातून कामगिरी कशी उंचवायची याबाबत त्यांनी दिलेले सल्ले खूपच मोलाचे ठरले, असेही पृथ्नीने सांगितले.