गोंडा – समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसने उत्तरप्रदेशात जातीयवादाला प्रोत्साहन दिले तसेच त्यांनी सतत दंगलीना प्रोत्साहन देऊन राज्याच्या विकासात अडथळे आणले असा आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केला आहे.
भारतीय जनता पार्टी उत्तरप्रदेशात सत्तेवर आल्यानंतर राज्यातील भूकबळींचे प्रकार थांबले, दंगली थांबल्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबल्या असा दावाही त्यांनी केला आहे. येथील बलरामपुर साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाचा पाया भरणी समारंभ आज त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, अशा प्रकारचे काम या आधीच्या सरकारांनाही करता आले असते पण त्यांनी ते केले नाही. त्या ऐवजी ते लोकांची दिशाभुल करून घराणेशाही चालवण्यातच मग्न राहिले असा आरोपही त्यांनी केला.
बबुआ आणि बुवा यांना चांगला कारभार करण्यास कोणी अडवले होते असा सवाल करून त्यांनी कॉंग्रेस सह बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षावरही सडकून टीका केली.त्यांच्या काळात केवळ भ्रष्टाचार, दंगली आणि गैरकारभारच झाला. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही दाव्यावर विश्वास ठेऊ नका असे आवाहन त्यांनी केले.
अखिलेश यादव यांच्या जिनांविषयीच्या वक्तव्याचाही योगींनी पुन्हा दाखला दिला. ते म्हणाले की त्यांचा केवळ पाकिस्तानच्या संस्थापकांवर विश्वास आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी समाजवादी पक्षाच्या सरकारने दहशतवाद्यांवरील गुन्हे मागे घेतले होते असा दावाही त्यांनी यावेळी केला. पण अलाहाबाद उच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करून त्यांना असे करू दिले नाही याबद्दल त्यांनी न्यायालयाचेही आभार मानले.