संत कबीरनगर (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील धर्मनिरपेक्ष आणि मुस्लिमांमधील फुटीला समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि कॉंग्रेस पक्षच जबाबदार आहे, असा आरोप पीस पार्टीचे अध्यक्ष डॉ. आयुब यांनी केला आहे. जर हे तिनिही पक्ष एकत्र आले तर या मतांमधील 90 टक्के मते विभागली जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.
“युनायटेड डेमोक्रॅटिक अलायन्स’च्या झेंड्याखाली मौलाना अमीर रशादी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय उलेमा परिषद, कुर्मी नेते डॉ बीएल वर्मा यांच्या नेतृत्वाखालील किसान पार्टी, श्याम सुंदर चौरसिया यांची जनहित किसान पार्टी, मोहम्मद शमीम यांच्या नेतृत्वाखालील नागरीक एकता पार्टी यासारखे छोटे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. “युडीए’चा सदस्य पक्ष म्हणून पीस पार्टी उत्तर प्रदेशातील 50 जागांवर निवडणूक लढवत आहे.
मुस्लिमांची मते विभागली गेल्यामुळे जर भाजपला फायदा झाला तर तो पीस पार्टी किंवा ओवेसींच्या पक्षामुळे होणार नाही. तर सपा, बसपा आणि कॉंग्रेस यांच्यामुळेच झालेला असेल, असेही डॉ. आयुब म्हणाले.
डॉ. आयुब हे गोरखपूर जिल्ह्यातील बरहालगंज येथील मागस मुस्लिम समाजातील सर्जन आहेत. त्यांनी 2009 च्या लोकसभा निवडणूकीच्यावेळी पीस पार्टीची स्थापना केली आणि 2012 च्या विधानसभेच्या निवडणूकीच्यावेळी त्यांच्या पक्षाचे 4 आमदार निवडून आले. 2017 च्या निवडणूकीत आयुब यांना एकही जागा जिंकता आली नव्हती.