मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत आज भाजपात प्रवेश केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांची घरवापसी झाली. या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच आगामी काळात भाजपात अनेकांचा प्रवेश होणार आहे, भाजपा सोडून कुणीही जाणार नाही. काहीजण उगाचच वावड्या उठवत असल्याचं म्हणत फडणवीस यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधल्याचेही दिसून आले.
नाशिक महापालिका निवडणुका जवळ येत असताना शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्याने, भाजपाकडून शिवसेनेला हा एकप्रकारे धक्का मानला जात आहे. दरम्यान, “महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढवतील, असं सांगितलं जात आहे. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर तशी इच्छाच आहे. असे वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले .
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी, “सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्रपणे लढवतील, असे त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर इच्छाच आहे. कारण, एकत्र लढल्याने एखादा तात्कालीक फायदा त्यांना होईल. परंतु, तीन पक्ष एकत्र आल्यामुळे जी राजकीय जागा असते, त्या जागेत किती लोकं मावतील? हे देखील एक महत्वाचं असतं. दोनच पक्ष एकत्रितपणे त्या राजकीय जागेत मावणं कठीण जातं, हे तीन पक्ष एकत्र येतो म्हणतात. याचा अर्थ असा आहे, त्यातली सर्वात मोठी जागा जी आहे ती भाजपासाठी ते मोकळी सोडणार आहेत आणि भाजपा ती जागा व्यापल्या शिवाय राहणार नाही. म्हणून एखाद्या-दुसऱ्या निवडणुकीत इकडंतिकडं झालं तरी चिंता करण्याची गरज नाही.”
याचबरोबर “सर्वांना हे देखील माहिती आहे की या देशाचे भविष्य राहुल गांधी, यूपीए नाही. तर या देशाचे वर्तमान व भविष्य नरेंद्र मोदी आहेत. याची कल्पना आमच्या सर्व नेत्यांना आहे. म्हणून एखादं धोक्याने आलेलं सरकार हे किती काळ चालतं? कसं चालतं? त्याचं पुढे काय होतं? या संदर्भातील सर्व माहिती सगळ्यांना आहे. म्हणून पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो, भाजपा मजबूतच होणार आहे.” असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.