नवी दिल्ली – बीसीसीआयने तयार केलेल्या नव्या नियमानुसार ज्या व्यक्तींचे वय 60 किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशांना प्रशिक्षक, सल्लागार तसेच अन्य कोणत्याही भूमिकेत कार्यरत राहता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. यावर बंगाल संघाचे प्रशिक्षक असलेल्या माजी कसोटी क्रिकेटपटू अरुणलाल यांनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय 69 आहे मग त्यांनाही घरी बसवणार का, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार 60 किंवा त्यावरील व्यक्तींनी मैदानात उतरू नये किंवा प्रशिक्षकपद भूषवू नये, असे स्पष्ट केले होते. तसेच अशा व्यक्तींनी मैदानात सराव सत्रादरम्यानही उपस्थित राहू नये, असेही जाहीर केले होते. कारण करोनाच्या विषाणूला कोण किती वर्षांचा आहे ते कळत नाही. याची बाधा कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होते मग केवळ क्रिकेटपटूंसाठीच हा नियम का? मोदी जर वयाच्या 69 व्या वर्षी देश चालवू शकतात तर मग मी क्रिकेट प्रशिक्षण का देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
प्रेक्षकांना परवानगी देण्याचा विचार – बीसीसीआय
आयपीएल स्पर्धा जरी होणार असली व अमिरातीत करोनाचा धोका अत्यंत अल्प असला तरीही प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार किंवा नाही हा निर्णय केवळ बीसीसीआय घेणार नाही तर अमिराती सरकार व क्रिकेट मंडळ घेईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. मार्च महिन्यापासून करोनाचा धोका जगभरात वाढल्याने आता पुढील काळातही हा धोका जरी कमी झाला तरीही जवळपास सहा महिने करोनाबाबतचे नियम पाळावेच लागणार आहेत.