पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षांनीच अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले का, अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाची यंत्रणा उभारण्यासाठी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पुणे शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसची आज बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह पवार गटातील अन्य नेत्यांना धारेवर धरले. याप्रसंगी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख उपस्थित होते.
भाजपसोबत जाण्याचा निर्णय आताचा नाही, तर २०१४ मध्येच झाला होता. त्यावर्षी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वंतत्र निवडणूक लढलो. विधानसभा निवडणुकीचे कल येत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला पाठिंबा जाहीर केला. मात्र, नंतर माघार घेतली. २०१६ मध्येही भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय झाला. त्यावेळीही माघार घेतली. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत सत्ता स्थापन केली.
तेथूनही माघार घ्यायला लावली, आता त्याच अदृश्य शक्ती आमच्यावर नैराश्यातून आरोप करत आहेत, असा टोला तटकरे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा नामोल्लेख टाळत केला. आम्ही आत्मविश्वासाने संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळत असून, पक्षात प्रवेश करणार्यांची संख्या वाढली आहे. पक्षाच्या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
लोकसभेच्या जागावाटपांबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. लवकरच मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जागा वाटप जाहीर करण्यात येईल.