रायगड – आरक्षणाचा विषय बऱ्याच जणांना संपवायचा नाही. या मुद्द्याचे राजकारण करून त्यांना फायदा घ्यायचा आहे. मात्र त्यांना या आरक्षणाचा काही एक फायदा झालेला नाही. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत त्यांचा लाभही मिळू देणार नाही. या लोकांचे स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
आरक्षणामुळे केवळ गोरगरीब मराठा बांधवांचे भले झाले आहे. त्यांना या आरक्षणाच्या माध्यमातून खूप काही मिळाल्याचेही जरांगे यांनी सांगितले. ज्या लोकांच्या अंगात स्वार्थ भिनला आहे, तेच लोक विरोध करत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी पत्रकारांनी जरांगेंना चार भितींच्या आत निर्णय का घेतला?, त्यावरून अनेकजणांकडून आरोपही केला जात आहे. या मुद्द्यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, आम्हाला केवळ आरक्षण मिळवायचे होते. जर मी मोकळ्या हाताने माघारी आलो असतो, तर माझ्यावर नक्कीच शंका घेण्यास वाव होता.
अधिकारी गर्दी पाहून घाबरत होते. त्यामुळे त्यांनी चार भिंतीच्या आतमध्ये चर्चा करण्याचे सांगितले. तरीही मी त्यांना बाहेरचे चर्चा करण्यास म्हटले. तर ते बाहेर चर्चा करणार नसून परत जाणार असल्याचे म्हणत होते. म्हणून मी चार भिंतीच्या आत चर्चा केली. आमचा मुद्दा हा आरक्षण मिळवणे होता. सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळवायचे होते, त्यावर अधीसूचना काढण्यात आली आहे.