मुंबई – भाजपकडून पंकजा मुंडे व विनोद तावडे या २ नेत्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजप या माध्यमातून पक्षावर नाराज असलेल्या पंकजा यांचे राजकीय पुनर्वसन करेल. तसेच बिहारमध्ये एनडीएचे सरकार आणल्याबद्दल विनोद तावडे यांना बक्षिसी देईल, असे सांगितले जात आहे.
संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. यापैकी ६ जागा महाराष्ट्रातील आहेत. या जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. त्यानंतर लगेच मतमोजणी होऊन विजयी उमेदवारांची घोषणा केली जाईल. राज्यसभेतून यंदा निवृत्त होणाऱ्या खासदारांत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे.
सध्याचे सत्ताधारी व विरोधकांच्या आमदारांचे संख्याबळ पाहता सत्ताधाऱ्यांचे सर्वाधिक ५, तर विरोधकांचे केवळ १ उमदेवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता असल्याचा दावाही केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून राज्यसभेसाठी विविध नावांची चाचपणी सुरू आहे. राज्यातून भाजप नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे व विजया रहाटकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. बिहारमध्ये भाजपाचे सरकार आणण्यात विनोद तावडे यांची महत्त्वाची भूमिका होती. याऊलट पंकजा मुंडे गत काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तावडेंना बिहारमधील कामगिरीची बक्षिसी दिली जाईल. तसेच पंकजा यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचीही नाराजी दूर केली जाईल असा दावा केला जात आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व याविषयी लवकरच योग्य तो निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.