मुंबई – परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळी कागदपत्रे दाखवत शरद पवारांच्या तोंडून चुकीची माहिती बोलवून घेतली गेली, असा दावा केला आहे. तसेच, फडणवीसांनी पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोपही केला आहे. यावर अतुल भातखळकर यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण करणारे नवे पुरावे आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले. पण तरीही ते निर्लज्जपणे खुर्ची उबवत बसले आहेत, तेवढाच निर्लज्जपणा दाखवत त्यांचे नेते देशमुखांचे समर्थन करीत आहेत. थोडक्यात काय तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण करणारे नवे पुरावे आज विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांनी उघड केले. पण तरीही ते निर्लज्जपणे खुर्ची उबवत बसले आहेत, तेवढाच निर्लज्जपणा दाखवत त्यांचे नेते देशमुखांचे समर्थन करित आहेत. थोडक्यात काय तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 23, 2021
दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्र्यांनी सचिन वाझे याला 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. यावर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यावर पांघरुण घातल्याचा आरोप केला.
तसेच, पोलिसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यांसंदर्भात फोन टॅपिंगचा ६.३ जीबी इतका डेटा माझ्या हाताला लागलेला आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस सांनी पत्रकार परिषदेत ऑडिओ सीडी आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल सादर केला.