शाळा…! प्रत्येकाच्या मनात एक खास आठवण जागवणारी वास्तू… घराची पायरी ओलांडून प्रथमच आपण “शाळा’ नावाच्या विश्वात प्रवेश करतो… शाळेबद्दल सुरुवातीला वाटणारी भीती हळूहळू नाहीशी होत जाते… खेळ, गाणी, कथा, कविता, गप्पागोष्टी यासोबतच सवंगड्यांची ओळख होत जाते… वेगवेगळ्या स्वभावाचे शिक्षक-शिक्षिका भेटतात… नित्य नव्या विषयांची ओळख होत जाते… एकेक यत्ता पुढे जात दहावीच्या वर्षअखेरीस आपण आपल्या प्रिय शाळेचा निरोप घेतो… परत या शाळेत येऊ की नाही, याची खात्री नसल्यामुळे शाळेच्या भिंतींवरून, त्यांच्या तोंडावरून हात फिरवित राहतो… आपल्याला शिक्षणासारखे पवित्र दान देऊन “माणूस’ म्हणून घडविणाऱ्या शाळेसाठी काहीतरी करावे, अशी इच्छा मनात ठेवून आपण पुढील वाटचाल सुरू ठेवतो… शाळेसाठी काहीतरी करण्याची प्रत्येकाचीच इच्छा पूर्ण होते असे नाही… मात्र, काही भाग्यवंतांची ही आस देखील पूर्ण होते… अशाच लोकांपैकी एक म्हणजे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती सौ. मनीषा पवार. मनीषाताईंनी महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतले असल्यामुळे आज शिक्षण समितीच्या माध्यमातून आपल्या शाळेसाठी अर्थात सर्वच महापालिका शाळांसाठी काहीतरी करण्याची त्यांची “मनिषा’ त्या पूर्णत्वास नेताना दिसत आहेत.
मनीषा पवार यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण चिंचवड येथील हुतात्मा चाफेकर विद्यालयात झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये असणाऱ्या गैरसोयी, उत्तम शिक्षक असतानाही अन्य साहित्याची वानवा, खासगी शाळांच्या तुलनेत होणारी उपेक्षा, अशा अनेक अडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळेच महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी त्या धडपडत होत्या. 2017 साली मनीषाताई पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या. नगरसेविका म्हणून काम करताना त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा विशेषतः शैक्षणिक कामांसाठी त्यांची तळमळ पाहून अवघ्या काही वर्षातच आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांना महापालिकेच्या शिक्षण सभापतिपदी संधी दिली.
शिक्षण सभापती म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केवळ खुर्चीवर बसून कामे न करता प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. महापालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शाळेत शैक्षणिक साहित्य तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. आजच्या काळात इंग्रजीचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन महापालिका शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दिल्लीतील शाळांमधील “डिजिटल क्लासरूम’ या संकल्पनेच्या धर्तीवर आपल्या महापालिका शाळांना “स्मार्ट’ बनवण्यासाठी असे वर्ग सुरू करण्यासंदर्भात त्यांचे काम सुरू असून लवकरच ते पूर्णत्वास येईल.
मनीषाताईंनी शिक्षण समितीच्या सभापतिपदाचा पदभार स्वीकारल्यापासून वर्षानुवर्षे रखडलेली अनेक कामे मार्गी लावली आहेत. अनेक महापालिका शाळांची इमारत, वर्गखोल्या तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्याबरोबरच अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्याचा प्रस्ताव आणला असून, लवकरच त्याचीही पूर्तता होईल. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत असले तरी हे प्रयत्न अपुरे पडत आहेत, ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शाळेतच “स्कॉलरशिप’ तसेच अबॅकसचे ज्यादा तास सुरू करण्याचा निर्णय मनीषाताईंनी घेतला. या निर्णयाचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना झाला आहे. महापालिका शाळांमध्ये गरीब कुटुंबातील मुले शिकतात. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न करून शाळांमध्येच संगीत शिक्षण अकॅडमी सुरू केली आहे. या उपक्रमाचेही स्वागत झाले असून यास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सद्यघडीला काही शाळांमधून प्रायोगिक तत्त्वावर संगीत ऍकॅडमी सुरूही झाली असून, येत्या काळात सर्वच शाळांमधून ही ऍकॅडमी सुरू करण्यात येणार आहे.
शिक्षण सभापती म्हणून काम करीत असताना दूरदृष्टीने काही चांगले आणि नवीन निर्णय घेताना मनीषाताई अजिबात कचरत नाहीत. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हिताचेही निर्णय त्यांनी घेतले आहेत. महापालिका शाळेतल्या सफाई सेवकांना अवघे दोन हजार रुपये मानधन मिळत होते, ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने या कर्मचाऱ्यांना शासनाच्या इतर किमान वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावे, असा प्रस्ताव शिक्षण समितीमध्ये संमत करून तो मान्यतेसाठी पुढे पाठविला आहे. यावरूनच शाळेसाठी झटणाऱ्या प्रत्येक घटकाला मनीषाताईंसाठी किती महत्त्वाचा मानतात, हे अधोरेखित होते.
मनीषाताईंना महापालिका शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, असे मनापासून वाटते. कारण सध्याच्या काळात खासगी शाळा, विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वाढते प्रस्थ, खासगी शिकवणी वर्ग, विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा, पालकांच्या विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा अशा अनेक पातळ्यांवर महापालिका शाळांमधील विद्यार्थी मागे पडताना दिसत आहे. त्यांची एकप्रकारे घुसमट होताना दिसते. हे विद्यार्थी मुख्यतः गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातून येत असल्यामुळे त्यांचे पालकही कमी शिकलेले अथवा निरक्षर असतात. त्यामुळे आपल्या पाल्याला उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ते आग्रही असण्याची शक्यता कमीच असते. या समस्येकडे लक्ष वेधून मनीषाताई म्हणतात की, यासाठी सर्वप्रथम महापालिका शाळांचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमात बदल होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी धडे देण्याबरोबरच कौशल्याधारित आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश केला पाहिजे.
इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी विशेष परिश्रम घेतले पाहिजेत. महापालिका शाळांचा सर्व स्तरावरील दर्जा सुधारण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. महापालिका शाळेच्या भिंतींना पडलेले तडे म्हणजे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भाग्यरेखा आहेत, असे मानणाऱ्या मनीषा पवार यांनी त्यांच्या जिद्दीने आणि कर्तृत्वाने त्यांची भाग्यरेखा तर उजळवली आहेच, पण उणिवांना आणि संकटांना संधी समजून त्यावर उपाय शोधणाऱ्या आपल्यासारख्या महापालिकेच्या असंख्य विद्यार्थ्यांना दिशाही दाखविली आहे, हे मात्र तितकेच खरे आहे.