समाजकारण आणि राजकारण… तसे पाहता दोन भिन्न क्षेत्र… मात्र, यांची सुयोग्य सांगड घालण्याचे कसब एखाद्या व्यक्तीला जमले की ती व्यक्ती समाजाच्या विकासात अतिशय मोलाची भर घालू शकते… समाजकारणातून राजकारण असो वा राजकारणातून समाजकारण असो हे दोन्ही रस्ते एकत्र आले, की समाजाचा, शहराचा, राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास निश्चित होतो. कुटुंबाकडून मिळालेले समाजसेवेचे बाळकडू, त्यावर उच्चशिक्षणाचा मुलामा, उत्तम संस्कार आणि संवेदनशील मनाची गोड गोळी सतत सोबत बाळगणाऱ्या “सुलक्षणा अशोक शिलवंत (धर)’ या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाकडून निरोगी, धडधाकट समाजकारण आणि राजकारणाचाच परतावा मिळणार, याबाबत दुमत नाही !
सुलक्षणाताईंची ओळख केवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका एवढीच मर्यादित नाही. तर त्यापूर्वी संत तुकारामनगर येथील अशोक नागरी सहकारी बॅंकेच्या “मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून त्यांनी काम केलं आहे. एक सुशिक्षित आणि अभ्यासू नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहेच. पण त्यांची समाजकारणाकडून राजकारणाकडे सुरू झालेली वाटचालही तितकीच प्रेरणादायी आहे.
पुण्याच्या सिम्बॉयसिस महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतलेल्या सुलक्षणाताईंनी आपल्या वडिलांच्या बॅंकेतच म्हणजे अशोक नागरी सहकारी बॅंकेतच आपली उमेदवारी सुरू केली. त्यांचे वडील श्री. अशोक शिलवंत हे पिंपरी- चिंचवड शहर भूमापन अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांच्याकडे येणाऱ्या अडल्या-नडल्या, परिस्थितीने गांजलेल्या, निरक्षरतेमुळे फसवल्या गेलेल्या लोकांची मोठी रीघ लागायची. ज्या समाजातून ते आले होते, त्या समाजातील वंचितांचे, शोषितांचे दुःख त्यांना पाहवत नव्हते. त्यांना शक्य होईल तेवढी मदत सुलक्षणाताईंचे वडील अशोक शिलवंत करायचे. या गरीब, गरजू लोकांना आर्थिकदृष्ट्या उन्नत करण्याचे ध्येय त्यांनी बाळगले.
गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उदात्त धोरणातून अशोक शिलवंत यांनी “अशोक नागरी सहकारी बॅंक’ या बॅंकेची स्थापना केली. अल्पावधीतच ही बॅंक लोकांना “आपली बॅंक’ वाटू लागली. तळागाळातील सामान्यजन आर्थिकदृष्ट्या सक्षमतेकडे पावले टाकू लागले. वडिलांचा सामाजिक कार्याचा वास पुढे नेत असताना बॅंकेच्या माध्यमातून आपण सर्वसामान्यांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना कोणते फायदे मिळवून देऊ शकतो, याचा अभ्यास करून सुलक्षणाताईंनी काही योजना राबविल्या आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली.
बॅंकेचे उदात्त धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी आसपासच्या परिसरातील झोपडपट्ट्या, चाळींमध्ये जाऊन लोकांना बॅंकेच्या योजना समजावल्या. आज अनेक वर्षांपासून या बॅंकेची दमदार वाटचाल सुरू आहे. यामध्ये सुलक्षणाताईंचा सिंहाचा वाटा मान्यच करावा लागेल.
दरम्यान, बॅंकेत महिलाही मोठ्या प्रमाणावर येत असत. आपल्या तुटपुंज्या कमाईतील पै-पै साठवीत घराला हातभार लावणाऱ्या गोरगरीब महिलांना पाहून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करावे, असा विचार सुलक्षणाताईंना नेहमी करायच्या. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर बचतगटांची स्थापना करण्यावर भर दिला. महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन लहान-सहान उद्योगाची सुरुवात करून देण्यासाठी कर्जवाटप केले. महिलांना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविल्या. त्याला परिसरातील महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्ताने सुलक्षणाताईंचा संपर्क वाढला. नागरिकांशी सुसंवाद वाढला. समाजासाठी, आपण राहतो त्या परिसरासाठी, आपल्या शहरासाठी काहीतरी ठोस करण्याची इच्छा निर्माण झाली. कुटुंबीयांनी त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या पाठिंब्याने सुलक्षणाताईंनी 2017 साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभे राहण्याचे ठरविले. त्यांचे आजवरचे निःस्वार्थी काम पाहिलेल्या प्रभागातील नागरिकांनी त्यांना मोठ्या मतांनी निवडून दिले. त्या प्रभाग क्र. 20 च्या नगरसेविका झाल्या. त्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्येही वाढ झाली.
सर्वांच्या सहकार्याने आणि वडिलांच्या मार्गदर्शनाने त्यांनी राजकीय वाटचाल सुरू केली. संत तुकाराम नगर, वल्लभ नगर, कासारवाडी, फुलेनगर, लांडेवाडी, पिंपरी भागातील नागरिकांशी नित्यनेमाने संवाद साधणे, त्यांच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे याबरोबरच सुलक्षणाताईंनी प्रभागातील पाणी समस्या, वीज, स्वच्छतागृह, रस्त्यांची कामे, वृक्षारोपण या कामांना प्राधान्य दिले. गरीब नागरिकांना औषधोपचारासाठी मदत करणे, महिलांना बचतगटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे अशा कामांमुळे त्यांची लोकप्रियता वाढू लागली. पक्षातर्फे आयोजित मोर्चा, आंदोलनांमध्ये त्या हिरीरीने भाग घेतात. पक्षाचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचे कार्यही उत्तमरीत्या पार पाडतात. महापालिकेतील कामकाजाचा व्यवस्थित अभ्यास करून मगच त्या सभागृहात बोलतात. त्यामुळे त्यांची एक वेगळीच छाप पडते, लांडेवाडीतील शिवसृष्टी तसेच पिंपरीतील भीमसृष्टीच्या धर्तीवर संत तुकाराम नगर येथे “तुकारामसृष्टी’ उभारण्यात यावी यासाठीचे निवेदनही सुलक्षणाताईंनी महापालिका आयुक्तांना दिले. आपल्या प्रभागाचा कायापालट करण्याचा त्यांचा मानस असून त्यादृष्टीने त्यांची वाटचालही सुरू आहे.
सुलक्षणाताई केवळ एक नगरसेविकाच नाहीत, तर समाजकार्यातही त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या “अशोक सर्वांगीण विकास सोसायटी’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजहितोपयोगी काम केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून अडीच वर्षांपूर्वी आपल्या अलौकिक कीर्तीने जगाच्या इतिहासात पहिले चक्रवर्ती सम्राट म्हणून नोंद असलेले सम्राट अशोक यांचे विचार, त्यांची मूल्ये समाजात रुजावीत म्हणून देशभर 50 फूट उंच व अडीच फूट रुंद असे अशोकस्तंभ उभारण्याचे गौरवशाली काम हाती घेतले आहे. आतापर्यंत ठिकठिकाणी 8 भव्य अशोकस्तंभांची उभारणी करण्यात आली असून, सम्राट अशोकांचे विचार रुजविण्याचे काम अखंडित सुरू आहे.
अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्या माध्यमातून गरीब, होतकरू तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तसेच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, रुग्णांना आर्थिक मदत तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मदत करणे अशी कामे प्राधान्याने केली जातात. या संस्थेच्या माध्यमातूनच महिलांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात सुलक्षणाताई पुढाकार घेतात. महिलांनी आपल्या पायावर उभे राहावे यासाठी त्या नेहमीच धडपडत असतात. अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्या माध्यमातून सुलक्षणाताईंचे समाजकार्यही तितक्याच जोरकसपणे सुरू आहे.