वेगवान पद्धतीने होणार समस्यांचे निराकरण
* आरोग्य तपासणी
* नागरवस्तीकडून प्रशिक्षण देणार
* व्यवसायासाठी मदत करणार
* स्वच्छतागृहांची देखभाल, स्वच्छता करण्याचे काम
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ सुंदर शहरासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याअंतर्गत रस्त्यावरील भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. हाच पॅटर्न शहरातील तृतीयपंथीयांसाठी राबविण्याबाबत प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. तृतीय पंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेत एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये क्रमांक मिळवण्यसाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच इंदोर शहराच्या धरतीवर शहरामध्ये स्वच्छतेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील रस्त्यावर, चौकांमध्ये भिक्षेकऱ्यांची गर्दी असते. तसेच रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे भिकारी राहत असून अस्वच्छता पसरवतात. त्यामुळे स्वच्छता करण्यात अडथळे निर्माण होतात. त्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन केले जाणार आहे. त्याला पुढील आठवड्यामध्ये सुरूवात होणार आहे. तर दुसरीकडे शहरातील तृतीय पंथीयांची देखील शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. चौकांमध्ये सिग्नलवर गाड्या थांबल्यानंतर हे तृतीयपंथीय भिक्षा मागत असतात. त्यामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये बाधा येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शहरातील तृतीयपंथीयांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. त्यानुसार शहरातील तृतीय पंथीयांना त्यांची समस्या मांडण्यासाठी एक खिडकी योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी एक अधिकारी व कर्माचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तृतीय पंथीयांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी सोय केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयामध्ये त्यांना विनामूल्य सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील झोपडपट्टी भागामध्ये महापालिकेने उभारलेल्या स्वचच्छतागृहांची स्वच्छता करण्याचे काम त्यांना देण्यात येणार आहे. त्याबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. तृतीय पंथीयांच्या हाताला काम देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल पिंपरी चिंचवड महापालिकेने उचलले आहे.
शहरातील भिकाऱ्यांप्रमाणेच तृतीय पंथीयांचे देखील पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच महापालिकेकडून स्वच्छतेच्या कामासाठी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होईल.
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त.
व्यवसाय उभारण्यासाठी मदत
तृतीयपंथीयांना रोजगार मिळाला तर त्यांना भिक्षा मागण्याची गरज पडणार नाही या उद्देशाने त्यांना नागरवस्ती विभागाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये शिवणकाम, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी त्यांना मदत करण्यात येणार आहे.