पाटण तालुक्यासारख्या दुर्गम व डोंगराळ भागामध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आपल्या कार्यकर्तृत्वाने बालविकास प्रकल्प अधिकारी ते गटविकास अधिकारी असा प्रवास करणाऱ्या पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्याविषयी….
आपल्या प्रशासकीय सेवेचा सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून श्रीगणेशा केला. बालविकास प्रकल्प अधिकारी गटविकास अधिकारी असा त्यांचा प्रशासनातील प्रवास दैदीप्यमान आहे. नागरिक आणि प्रशासन यांची सांगड घालून कायद्याबरोबरच नागरिकांना सुविधा देणे शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे महत्वाचे काम त्यांनी केले.
याची दखल म्हणूनच त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेने उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून गौरवले होते. सांगोला याठिकाणी उल्लेखनीय काम केले. बालविकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाड्या त्यांनी आयएसओ केल्या. पुढे बालविकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवा सुविधा त्यांनी प्रभावीपणे राबवून बालविकास प्रकल्प विभागाचा लौकिक जिल्ह्यात वाढवला.
2013 साली मिरज तालुका याठिकाणी त्यांची नियुक्ती सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून झाली. सुरुवातीपासूनच त्यांची समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा ही तळमळ होती. याही काळात त्यांनी मिरज पंचायत समितीच्या लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न केला.
त्यानंतर त्यांची बदली आटपाडी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून झाली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी आटपाडी पंचायत समितीला यशवंत पंचायत राज्य हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवून दिला. दुष्काळी भाग म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष होते. यासाठी त्यांनी शासनाच्या जलयुक्त शिवार पाणी फाउंडेशन या माध्यमातून दुष्काळ हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. पहिल्या 10 मध्ये त्यांच्या गावांचा समावेश झाला होता.
जलयुक्त शिवार व पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले. प्रशासनातील कामाचा अनुभव इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी दुष्काळावर मात केली. शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवली. याचकाळात त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांचा गतिमान प्रशासन व उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव केला.जिल्ह्यात विभागीय मूल्यांकनामधील आपला ब्लॉक त्यांनी सातत्याने वरच्या क्रमांकावर ठेवला.
पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून त्यांना नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षाच्या काळातही त्यांनी पाटण तालुक्यातील गावांना शासनाच्या विविध योजनांमधून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. दुर्गम व डोंगराळ अशी भौगोलिक परिस्थिती असताना त्यांनी प्रभावीपणे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. यावर्षी पूर परिस्थितीसह अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता.
अशा अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी पंचायत समितीच्या टीमला सोबत घेऊन अतिवृष्टी काळात लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून पूरग्रस्तांना आधार देण्याचे काम केले होते. स्वतःच्या ऑफिसमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असताना स्वतः कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन पंचायत समितीच्या दप्तरचे होणारे नुकसान त्यांनी टाळले. राष्ट्रीय पेयजल योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजना स्वच्छता अभियान तालुक्यात नव्याने बिहार पॅटर्न राबवण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
गावोगावी स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन सार्वजनिक स्वच्छता व वैयक्तिक स्वच्छता प्लॅस्टिकमुक्ती शोष खड्डे सार्वजनिक शौचालयांचा वापर या म्ुद्यांवर त्यांनी लोकसहभागातून प्रत्येक ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करण्याचे काम चालू केले आहे. नुकतेच शासनाच्या स्मार्ट व्हिलेज या संकल्पनेतून तालुक्यातील गिरेवाडी या गावाला तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांनी सांगितले.
पाटण तालुक्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवून लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना या ठिकाणी लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. या तालुक्यातील नागरिक कोणत्याही विधायक कामाला विरोध करत नाहीत. त्यामुळे लोकसहभागातून कोणतीही शासनाची योजना पाटणसारख्या दुर्गम भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या ठिकाणी राबवणे शक्य होत आहे.
तालुक्यातील मान्याचीवाडी हे राज्यात आदर्श गाव ठरले आहे लोकसहभागातून गावाचा कायापालट झाला आहे या गावाची जीपीडीपी ऍवॉर्डसाठी निवड झाली आहे. ही बाब माझ्यासाठी आनंदाची आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे गावांच्या विकासाला प्राधान्य दिल्यास तालुक्यातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे व शासनाच्या विविध पुरस्कारांसाठी ही गावे पात्र ठरणार आहेत. भविष्यात तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात आरोग्य आणि शिक्षण या बाबींवर जोर देऊन येणाऱ्या पिढ्या सदृढ आणि उच्चशिक्षित होण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे मिना साळुंखे यांनी सांगितले.