स्वप्नांचा पाठलाग करीत यश खेचून आणणाऱ्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे
स्वप्नं सगळेच पाहतात… कुणाला डॉक्टर बनायचे असते, तर कुणाला बिजनेसमॅन… कोणी सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची स्वप्नं पाहतो तर कोणी चित्रपटात काम करण्याची. पण सगळ्यांचीच स्वप्नं पूर्ण होतील, असे नाही. स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी सतत त्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो… त्यादिशेने खरीखुरी वाटचाल सुरू करावी लागते… कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी लागते… कितीही संकटे आली तरी त्यांचा सामना करण्याची हिम्मत ठेवावी लागते… प्रसंगी हारही पत्करण्याची तयारी ठेवावी लागते… तेव्हा कुठे मनाच्या तळाशी पहुडलेल्या स्वप्नाच्या बीजाला सत्याचा अंकुर फुटू लागतो…. या अंकुराला आपल्या मेहनतीचे खत घालून, प्रामाणिकपणाचे पाणी शिंपडत जगवत राहावे लागते… मग या स्वप्नांचे खरेखुरे रोपटे बहरू लागते… आपल्या कर्तृत्वाच्या सुगंधी कळ्या त्यावर येऊ लागतात आणि सरतेशेवटी वास्तवात आपल्या कीर्तीची फुले उमलतात…! काही मोजक्याच भाग्यवंतांची स्वप्ने सत्यात उतरतात. शिक्षणक्षेत्रात उच्चपदावर पोहोचून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ठोस कामगिरी करण्याचे स्वप्नं ज्योत्स्ना शिंदे यांनीही पाहिले होते… मोठ्या कष्टाने आणि आत्मविश्वासाने, अडीअडचणींवर मात करीत त्यांनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरूच ठेवला… अखेर “शिक्षणाधिकारी’ बनण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरलेच. अर्थात ही बाब सोपी अजिबात नव्हतीच. संसार आणि शिक्षणाची सांगड घालीत ज्योत्स्नाताईंनी पूर्ण केलेल्या ध्येयाची ही आदर्शवत कहाणी…!
दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्योत्स्नाताईंचा विवाह झाला. पहिले दोन वर्ष मुंबईत राहिल्यानंतर त्या कोल्हापूरला स्थायिक झाल्या. गृहिणी म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांच्या मनामध्ये काही स्वप्नं तरळू लागले. शिक्षणाची ओढ होतीच. संसारात व्यस्त असतानाही त्यांनी पुढचे शिक्षण घ्यायचे ठरविले. प्रत्येक यशस्वी पुरुषांमागे एक स्त्री असते. मात्र ज्योत्स्ना यांच्या पाठीमागे त्यांचे पती खंबीरपणे उभे राहिले. तेथूनच त्यांचा नवीन संसार आणि शिक्षण असा प्रवास सुरू झाला. अकरावी व बारावीमध्ये त्या कला शाखेतून प्रथम आल्या. त्यानंतर त्यांनी डीएडला प्रवेश घेतला. 1995 साली त्यांनी डीएड पूर्ण केले. त्यानंतर पहिल्याच मुलाखतीमध्ये त्यांना नोकरी मिळाली. तेथून संसार, नोकरी आणि संसाराच्या वेलीवर फुललेले फूल अशी तिहेरी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. जबाबदाऱ्यांचे ओझे खांद्यावर असतानाही त्यांनी एसवायबीएला प्रवेश घेतला. 2002 मध्ये त्या बीए झाल्या. नंतर बीएडला प्रवेश घेतला. शिक्षणाची घोडदौड सुरुच होती. मात्र कौटुंबिक समस्याही पाठ सोडत नव्हत्या. असे असतानाही त्यांची स्वप्ने त्यांना शांत बसू देत नव्हती. एका हिंदी चित्रपटातील संवाद आहेच की, सपने वो नही होते जो नींद में देखे जाते है, सपने तो वो होते है, जो तुम्हे सोने नही देते !
दरम्यान करिअर म्हणून निवडलेल्या क्षेत्रात उच्चपदापर्यंत पोहोचायचेच असे त्यांनी ठरविले होते. त्यांच्या शिक्षणाचा पुढचा टप्पा म्हणजे एम.ए, एमएडची पदवी. ती ही त्यांनी मिळवली. फेब्रुवारी 2013 मध्ये त्यांची शिक्षणाधिकारीपदी निवड झाली. अनेक वर्षे उराशी जपलेलं त्यांचं स्वप्न सत्यात उतरलं. त्यांनी केलेले कष्ट आणि कुटुंबांनी दिलेली भक्कम साथ या जोरावर त्या शिक्षणाधिकारी झाल्या.
शिक्षणाधिकारीपदी निवड झाल्यानंतर 40 दिवसांचे त्यांचे प्रशिक्षण पार पडले. त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या “जीवन शिक्षण’ या मासिकात संपादक म्हणून झाली. हे पद भूषवित असताना त्यांनी अनेक उपक्रम राबविले. या काळात लेखक कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर घेतल्या. 2013-14 मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सुवर्ण महोत्सव होते. त्यामुळे “सुवर्णवेल’ या सुवर्णमहोत्सवी अंकाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. ज्योत्स्नाताईंनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. मान्यवर व वरिष्ठांनी अंकाचे खूप कौतुक केले. अशीच यशाची घोडदौड त्यांची सुरूच होती. 25 मे 2018 रोजी त्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली.
नवीन शहर असतानाही त्यांनी आपल्या कामामध्ये कोठेही कमी ठेवली नाही. महापालिकेच्या शाळा सुधारल्या पाहिजे. त्या शाळांची गुणवत्ता वाढली पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. खासगी इंग्रजी शाळांच्या तोडीस तोड शाळा तयार करण्यावर त्यांनी भर दिला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांविषयी आज परिस्थिती बरीचशी बदलली आहे. यासंदर्भात शासनाने अनेक योजना राबविल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये इयत्ता पहिलीपासून इंग्रजी शिक्षण सुरू आहे. आज अनेक मराठी माध्यमांच्या शाळांमधून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू आहेत. त्यामुळे आज मराठी माध्यमांच्या शाळांमधून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. महापालिकेच्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्ता वाढविण्यावर त्यांनी भर दिला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ज्योत्स्नाताई नेहमीच आग्रही राहिल्या आहेत. पुस्तकी ज्ञानाप्रमाणेच विद्यार्थ्यांना विविध कला आत्मसात करता याव्यात, यासाठी त्यांनी नवनवीन उपक्रम राबविले. त्यांच्या प्रयत्नांमुळे महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध कलेचे शिक्षण दिले जात आहे. अनेक शाळांमध्ये संगीताचे धडे त्यांनी सुरू केले. तसेच इंग्रजीमध्ये विद्यार्थी हुशार करणे काळाची गरज आहे हे ओळखून त्यांनी त्यावर भर दिला. मात्र त्यासाठी पहिल्यांदा शिक्षकांच्या मनातील इंग्रजीची भीती घालवली पाहिजे हे त्यांनी अचूक हेरले. त्यातून महापालिकेच्या शिक्षकांना सेमी इंग्रजीचे धडे ही संकल्पना समोर आणली. त्यामुळे आज शिक्षक आत्मविश्वासाने आणि उत्तमरित्या इंग्रजी शिकवत आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर त्यांनी भर दिला आहे. शाळेत गेल्यानंतर आपला पाल्य सुखरुप आहे याची पालकांना जाणीव व्हावी. यासाठी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तसेच विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यावर भर दिला आहे. शाळा स्मार्ट कशा होतील यासाठी विविध कंपन्यांशी टायअप करून त्यांनी शाळा सुधारण्यावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी महत्त्वाचे ठरणारे घटक म्हणजे शाळा, शिक्षण व समाज. या तीन घटकांमधील त्रुटी नाहीशी करून हे घटक जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कसे उपयुक्त ठरतील, यावरही त्यांचा अभ्यास सुरू आहे.
आज महिला सर्वच क्षेत्रात उत्तम काम करताना दिसतात. या बदलत्या प्रवाहाबद्दल बोलताना ज्योत्स्नाताई म्हणतात, “हा बदल महिलांसाठी प्रेरणादायी आहे. महिला आज ग्रामपंचायत सदस्यांपासून ते अंतराळात भरारी घेण्यापर्यंत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत. आजचे चित्र पाहता स्त्रियांनी मिळालेल्या संधीचे सोने केलेले आहे. ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. हे जरी खरे असले तरी आजही महिला म्हणावी तितकी सुरक्षित नाही. यासाठी तिने सुरक्षेचे धडे घेतले पाहिजे. प्रत्येकाने स्वप्नं बघायलाच हवे. कारण तीच स्वप्नं माणसाला जगण्याची, पुढे जाण्याची उर्मी देतात. माझीही स्वप्नांची मालिका अजून संपलेली नाही.’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले. आपल्यासारख्या असंख्य महिलांना प्रेरणा देणाऱ्या ज्योत्स्नाताईंची ही उमेद पाहून आपसूकच काही ओळी सुचतात…
“एक नई सुबह, एक नई आशा,
एक नई उम्मीद, एक नई सोच
एक बार फिर आसमा छूने की कोशिश
कामयाब होने की चाहत
सुबह की पहली किरण के साथ!’
“विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य शिक्षक करत असतात. त्यासाठी विषयातील परिपूर्ण ज्ञान, अनुभवसंपन्न, आत्मविश्वासू, नियमांचे पालन करणारा व विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होईल, असे शिक्षण देणारा शिक्षक असावा. त्याला विविध कलागुणही अवगत असायला हवेत. कारण याच गोष्टी विद्यार्थ्यांना घडविण्यास मोलाच्या ठरतात. निश्चित ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी स्वप्न, मेहनत, सातत्य, आत्मविश्वास, आणि श्रद्धा ही पंचसूत्री खूप महत्त्वाची आहे. पती, मुलगा तुषार, माझे शिक्षक, मित्रमैत्रिणी, घरची मंडळी यांनी सतत प्रोत्साहन देऊन मानसिक बळ दिले. यशाचे श्रेय त्यांनाही अधिक जाते. याची जाणीव ठेवूनच समाजाने जेवढे दिले, त्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे चांगले भविष्य घडविण्यासाठी कायमस्वरुपी प्रयत्न करणार आहे. “
– ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी,
पिंपरी-चिंचवड महापालिका