धाराशिव :- काम करणारे मजूर पळून जाऊ नयेत म्हणून त्यांना भयंकर शिक्षा दिल्याची घटना महाराष्ट्रातील धाराशिव इथे समोर आली आहे. हृदयद्रावक अशा या घटनेने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. गुलामांना ज्या पद्धतीची वागणूक पूर्वी दिली जात होती तसाच प्रकार पुन्हा एकदा धारशिवमध्ये घडल्याचे समोर आले आहे.
धाराशिव येथे विहिरीवर काम करण्यासाठी आणलेल्या मजुरांना साखळ दंडाने बांधून ठेवल्याचे समोर आले आहे. दिवसभर विहिरीत खोदकाम करून घेतल्यानंतर रात्री पळून जाऊ नये म्हणून मजुरांना साखळीने ट्रॅक्टरला बांधून ठेवण्यात आले होते. पोलिसांनीच गुप्त माहितीच्या आधारे हा प्रकार समोर आणला. 11 मजुरांची यातून सुटका करण्यात आली आहे.
वखारवाडी येथे संदीप रामकिसन भोकसे हा तरुण मुजराकडून दिवसभर काम करून घेत असे. त्यानंतर रात्री साखळीने बांधून ठेवायचा. यामुळे मजूर कुठेही जाऊ शकत नव्हते.
या संपूर्ण घटनेची माहिती ढोकी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ढोकी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या पथकाने कारवाई केली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.