नवी दिल्ली – दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याची दक्षिण कॅम्पसमधील आर्यभट्ट कॉलेजबाहेर रविवारी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, प्रेयसीवरून दोन मुलांमध्ये वाद झाला होता. निखिल असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो पश्चिम विहारचा रहिवासी होता. स्कूल ऑफ ओपन लर्निंगमधून राज्यशास्त्रात बीए (ऑनर्स) करत होता.
पोलिसांनी सोमवारी सकाळी दोन आरोपींना अटक केली. निखिलच्या मैत्रिणीला एक तरुण अनेक दिवसांपासून त्रास देत होता. निखिलने याला विरोध केला असता आरोपींनी त्याच्या साथीदारांसह चाकूने वार केले. हल्ल्यानंतर निखिलला जवळच्या रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.
महाविद्यालयाच्या गेटबाहेर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे चार मुले दुचाकीवरून आले आणि त्यांनी निखिलच्या छातीत वार केले. पोलिसांनूसार, निखिलचा आरोपी विद्यार्थ्यासोबत आठवडाभरापूर्वी वाद झाला होता. त्यानंतर बदला घेईन असे सांगून तो तरुण निघून गेला. रविवारी सकाळी त्याने मित्रासोबत दुचाकीवरून कॉलेज गाठले आणि गेटवर निखिलची हत्या केली.