मंचर -आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघात आढळलेले सहाही करोना रुग्ण मुंबईहून आलेले आहेत. काही दिवसांत सुमारे आठ ते दहा हजार नागरिक बाहेरुन आपापल्या घरी आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
वळसे पाटील म्हणाले की, मुंबई, पुणे व इतर शहरांमधून गावाकडे येणाऱ्या लोंढ्यामुळे ग्रामीण भाग असुरक्षीत झाल्याचे नागरिकांना वाटू लागले आहे. परंतु तीन-चार दिवसांत रुग्ण आढळून आले आहेत. तरी ज्या घरात बाहेरून आलेले लोक आहेत. त्या घरात कोणालाही थंडी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसली तर तात्काळ गावातील प्रशासन यंत्रणेला कळवा. ज्या कुटुंबातील व्यक्ती करोना स्वॅब तपासणीसाठी गेली आहे .त्या घरातील लोकांनी व त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी घरातच राहिले पाहिजे.
मुंबई, पुणे व इतर शहरांमधून आलेल्या लोकांनी सहकार्य करा. तालुका प्रशासन, आरोग्य विभाग, संस्था, पदाधिकारी या सगळ्यांनी जे प्रयत्न, कष्ट केले. त्यामुळे आपण सुरक्षीत राहिलो; मात्र बाहेरून आलेल्या आपल्याच बांधवांमुळे करोनाचा शिरकाव झाला आहे. यातूनही आपण सुरक्षीत बाहेर येवू व पुढेही सुरक्षीत राहु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
“गृह विलगीकरण करून घ्या’
मुंबई, पुणे व इतर शहरांमधून आलेल्या नागरिकांनी स्वत:च्या, कुटुंबाची व गावाच्या सुरक्षेसाठी स्वत:ला गृह विलगीकरण करुन घ्या. बाहेर फिरू नका. काही लक्षणे आढळून आल्यास गावातील प्रशासन यंत्रणेला कळवा, असे आवाहन मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे