पुणे: राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची की नाही, हा निर्णय मंत्रालयावर लालफितीत अडकला आहे. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबतचा कृती आराखडा तयार केला आहे. या कृती आराखड्यास पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देत परीक्षेसाठी सज्ज असल्याचे सूचित केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार विद्यापीठाने पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्ष, तर पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनावर पुढील वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. परंतु अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी पुणे विद्यापीठाने यापूर्वीच पारंपरिक पद्धतीने लेखी परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विद्या परिषदेच्या बैठकीत या परीक्षा कशा पद्धतीने द्यायचा याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यास मान्यता देण्यात आली. त्यात 50 गुणांसाठी परीक्षा दीड तासात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉगचे पेपर 1 ते 15 जुलै या दरम्यान होईल. महाविद्यालय स्तरावरच प्रश्नसंच काढून तिथेच पेपर तपासले जातील. दि. 16 ते 31 जुलै या दरम्यान अंतिम वर्षाची नियमीत परीक्षा होईल. यामध्ये विद्यापीठाने पेपर काढून ते महाविद्यालयांना पाठविले जाणार आहेत. 50 गुणांची परीक्षा दीड तासात घेतली जाणार असून, उत्तरपत्रिका महाविद्यालय स्तरावरच तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकर उत्तरपत्रिका तपासणी करून निकाल वेळेत लागणार आहे.
पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय
पुणे विद्यापीठात महाराष्ट्रासह अन्य राज्यातील व परदेशातील विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी आहे. हे सर्व विद्यार्थी घरी आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात परीक्षांसाठी येऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित रहाणार नाही. तसेच पुण्यात येऊन परीक्षा देणे विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर त्यांना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सोयीचे केंद्र ही निवडण्याची संधी दिली जाणार आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.