आज १२ डिसेंबर… राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री, माजी केंद्रीय संरक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे देशाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब हे आज वयाची ८३ वर्षे पूर्ण करून ८४ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त मा. साहेबांना मन:पूर्वक शुभेच्छा…!
देशातील मागील सहा दशकांच्या राजकारण, समाजकारणाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर काही अपवाद वगळता एखादाच नेता इतका दीर्घकाळ सामान्य जनतेशी नाळ जोडून ठेवू शकला आहे. त्यातही अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल, ते आदरणीय पवार साहेबांचं. असंख्य संकटे आली, तरी नियतीसमोरही जो झुकला नाही अशा वादळाचं नाव म्हणजे शरदचंद्र पवार. सह्याद्रीचा हा सुपुत्र नेहमीच वादळांना अंगावर झेलत आला, संघर्षाला मिठी मारत आला. माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा आदरणीय पवार साहेबांबद्दल दोन शब्द लिहू पाहतो तेव्हा शब्दही अपुरे पडतात.
आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या-देशाच्या राजकीय व सामाजिक पटलावर आपला अमीट ठसा उमटवला. मंडल आयोग स्वीकारणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं ते आदरणीय पवार साहेबांच्याच नेतृत्वात. एकेकाळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अपवादाने एखाद महिला नेतृत्व दिसायचं, हे चित्र बदलण्यासाठी पवार साहेबांनी स्वतःच्या पक्षातील मंत्री,आमदार व खासदारांचा विरोध पत्करून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
या एका निर्णयाने महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात राजकीय नेतृत्वाचा सूर्योदय झाला. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना देशपातळीवर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामधे महिलांना ५०% आरक्षण देण्याचा निर्णय पवार साहेबांच्याच पुढाकाराने झाला. महिलांचे जीवन सुरक्षित करून पवार साहेबांनी आपल्या आईने दिलेले संस्कार कृतीतून सिद्ध केले. साहेब मुख्यमंत्री असताना सातबाऱ्यावर पतिबरोबर पत्नीचे नाव ठेवण्याचा निर्णय, रेशनकार्डावर कुटुंबप्रमुख म्हणून महिलेचं नाव आलं आणि कुटुंब व्यवस्थेत महिलेला मानाचं स्थान मिळालं, असा ऐतिहासिक निर्णय घेणार महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं.
राज्यातील पोलीस दलात महिलांच्या सहभागासाठी पवार साहेबांनी विशेष प्रयत्न केले. देशाचे संरक्षणमंत्री असताना पवार साहेबांनी तीनही संरक्षण दलांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, असा आग्रह धरत महिलांसाठी संरक्षण दलांचे दरवाजे उघडले. आज पुणे शहर जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून अभिमानाने उभं आहे याच श्रेय सर्वस्वी आदरणीय पवार साहेबांना जातं. या परिसरात असंख्य सवलती दिल्या, सुविधा दिल्या, लाखो तरुणांना रोजगार मिळाला. मगरपट्टा, खराडी येथेही स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आयटी पार्क उभारले. या जोरावर पुण्यातील बांधकाम क्षेत्र व इतर क्षेत्रांत मोठी उलाढाल होऊ शकली.
भविष्यातील व्याप ओळखत ३०-३५ वर्षांपूर्वी टेमघर धरण बांधून पवार साहेबांनी पुणे शहराची पुढील ५० वर्षांची तहान भागवली. त्यांच्या प्रयत्नांतून रांजणगाव, चाकण, दौंड, बारामती अशा अनेक तालुक्यांच्या ठिकाणी एमआयडीसी उभ्या राहिल्याने लाखो भूमिपुत्रांना रोजगार मिळाला, साहेबांनी आग्रहपूर्वक चाकण आणि रांजणगाव एमआयडीसी स्थापन करून तेथील ऑटोमोबाइल क्षेत्राला पूरक उद्योग सुरू केले, म्हणूनच तिथून पुढच्या काळात पिंपरी चिंचवड हे ऑटोमोबाइल हब होऊ शकलं.
माझ्यासारखे असे लाखो कार्यकर्ते राज्यात सापडतील ज्यांना कोणतीही राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नसताना अनेक उच्च पदांपर्यंत पोचता आलं ते केवळ पवार साहेबांमुळे. स्वर्गीय आर.आर.पाटील साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते… त्यावेळेच त्यांचं एक वाक्य आहे कि, आदरणीय पवार साहेबांनी १० जून १९९९ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती केली, राष्ट्रीय पक्ष निर्माण केला.
साहेबांनी स्वतः मोठ्या पदांवर जाण्याचा मोह टाळून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, हे वाक्य माझ्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांसाठी लागु आहे, हे आम्ही कधीच विसरु शकत नाही. साहेबांना यापुढेही उदंड आयुष्य लाभावं व त्यांचा हात कायम आमच्या पाठीशी असावा हीच सदिच्छा !
– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट)