ज्ञानेश्वर फड/एम. डी.
आळंदी –
देव निवृत्ति यांनी धरिलें दोन्ही कर ।
जातो ज्ञानेश्वर बैसावया ॥
नदीचिया माशा घातलें माजवण ।
तैसें जनवन कलवलें ॥
दाही दिशा धुंद उदयास्ताविण ।
तैसेंचि गगन कालवलें ॥
जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी ।
पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥
ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा ।
पादपद्मीं ठेवा निरंतर ॥
तीन वेळां तेव्हां जोडिलें करकमळ ।
झांकियेले डोळे ज्ञानदेवें ॥
भीममुद्रा डोळा निरंजन मैदान ।
झालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥
नामा म्हणे आतां लोपला दिनकर ।
बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥
श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात पहाटे 3 वाजता प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक, सकाळी 7 ते 9 हैबतबाबा पायरीपुढे हैबतबाबा आरफळकर यांचे तर्फे कीर्तन, 7 ते 9 संस्थानतर्फे विणा मंडपात कीर्तन, दाणेवाले निकम दिंडीतर्फे 7 ते 9 आणि 9 ते 11 भोजलिंगकाका मंदिरात कीर्तन, 9 ते 12 नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन अशा भक्तीमय वातावरणात दुपारी 12 ते 12.30 वाजता दरम्यान पुष्पवृष्टी, घंटानाद आणि आरती होऊन कार्तिक वद्य त्रयोदशी सोमवार (दि. 11) श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 727 वा संजीवन समाधी सोहळा हरिनाम गजरात पार पडला.
समाधी सोहळा कीर्तनात नामदास महाराज यांनी आळंदी तीर्थक्षेत्राचा महिमा, माऊलींचे चरित्र, समाधीचा प्रसंग आदी विषय सांगितले. समाधी सोहळ्याचा प्रसंग सांगताना नामदास महाराज यांच्यासह श्रोत्यांचे डोळे पाणावले होते. समाधी सोहळ्यानिमित्त माऊली मंदिरात रांगोळी, फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
तीन लाख भाविकांनी घेतले समाधी स्पर्श दर्शन
माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला मंगळवार (दि. 5) पासून सुरुवात झाली होती. सोमवारपर्यंत (दि. 11) तब्बल तीन लाख भाविकांनी माऊलींच्या समाधीचे स्पर्श दर्शन केले. याकाळात अभिषेक, आरती, नैवेद्य असे नित्योपचार वगळता इतर 24 तास दर्शन खुले ठेवण्यात आले होते. तसेच लाखो भाविकांनी महाद्वारातून मुख दर्शन घेतले. आठवडाभराच्या सोहळ्या दरम्यान 5 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी आळंदीला भेट दिली. काही भाविक 2 दिवस तर काही 5 दिवस 7 दिवस आळंदी मुक्कामी राहिले. भाविकांची ये-जा सुरू होती. गर्दी टाळण्यासाठी काही भाविकांनी एकादशीआधीच दर्शन घेऊन गावी परतले. तर लाखो भाविक दशमीच्या रात्री आणि एकादशीच्या दिवशी आळंदीत पोहोचले आणि द्वादशीला (दि. 10) गावी परतले होते. तर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानंतर जवळपास 90 टक्के भाविक गावी परतले.
यात्रेत कोट्यवधींची उलाढाल –
आळंदीची कार्तिकी यात्रा राज्यातील प्रमुख यात्रांपैकी आहे. देश-राज्यातील 5 लाखांपेक्षा जास्त भाविक या सोहळ्याला येतात. यावेळी विविध प्रकारच्या साहित्य विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाली. गेल्या वर्षी (2022) करोनानंतर पहिल्यांदा मोठी यात्रा भरली होती. मात्र यंदा भाविकांची संख्या मोठी असली तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत भाविकांकडून कमी खरेदी केली गेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर काही विक्रेत्यांनी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही चांगला व्यवसाय झाल्याचे सांगितले. तुळशीच्या माळा, मूर्ती, ग्रंथ, लहान मुलांची खेळणी यांची चांगली विक्री झाली.
धोती, उपरणे, टोप्या, रेडिमेड धोती यांची चांगली विक्री झाली. यावर्षी थंडी कमी असल्यामुळे स्वेटर, थंडीच्या शाली यांची विक्री गेल्यावर्षीपेक्षा कमी झाली.
– दयाघन शेवाळे, कापड विक्रेते
हरिपाठ, ज्ञानेश्वरी, भजनी मालिका, तुकाराम गाथा, भगवद्गिता, संत चरित्रे, रोजनिशी आदी वारकरी सांप्रदायिक ग्रंथ भाविकांनी खरेदी केले; मात्र गेल्यावर्षीपेक्षा यंदा काहिअंशी कमी प्रमाणात विक्री झाली.
– गुजर बंधू, ग्रंथ विक्रेते
मृदंग, टाळ, वीणा, हार्मोनियम आदी वारकरी संप्रयादायिक वाद्यांची अपेक्षित चांगली विक्री झाली.
– बाळासाहेब गुरव, भजनी साहित्य विक्रेते
माऊलींच्या समाधी सोहळा बंदोबस्त करायला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. माझे आजोबांनी 30 वर्षे पंढरपूर, त्र्यंबकेश्वर वारी केली. मलाही त्यांच्यामुळे लहानपणापासून आवड होती. आज वारकऱ्यांच्या रूपात माऊलींची सेवा घडली. कोयाळी फाटा येथे नाकाबंदी पोस्टवर तैनात होतो. काम करताना कसलाही थकवा जाणवला नाही. पुढील वर्षीही माऊलींची सेवा मिळावी अशी इच्छा आहे.
– मन्साराम एस. पाटील, नंदुरबार महामार्ग पोलीस
विवेक सावंत यांना समाधी संजीवन पुरस्कार –
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून यावर्षी समाजिक उपक्रम म्हणून समाधी संजीवन पुरस्कार देण्यात आला. एम. के. सी. एल पुणेचे कार्यकारी संचालक विवेक सावंत यांना हा प्रथम समाधी संजीवन पुरस्कार देण्यात आला. यावेळी माऊलींच्या समाधीसमोर सावंत यांना देवस्थान कमिटी विश्वस्त अॅड. विकास ढगे, अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, भावार्थ देखणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
आजचे कार्यक्रम
कार्तिक आमावस्या मंगळवारी (दि. 12) पहाटे 3 ते 5 पवमानपूजा, दुधारती. सकाळी 5 ते 11 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य, दुपारी 4 ते 6 श्री मोझे यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री 8 ते 8.30 धुपारती, रात्री 9.30 ते 12.30 श्रींचा छबिना, रात्री 12.30 शेजारती पार पडणार आहे.